मुंबई – मराठी भाषा विभागाने मराठी भाषेच्या सर्व उपक्रमांना पुढे नेण्याचे काम केले आहे. ते कौतुकास्पद असून त्याचे फलित आज दिसू लागले आहे. मराठी भाषेचा समृद्ध वारसा पुढे चालविण्याची गरज आहे. यासाठी “मराठी बोला, मराठीतून व्यवहार करा व मराठीचा आग्रह धरा’ असे आवाहन मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी केले.
मराठी भाषा विभाग, राज्य मराठी विकास संस्था, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, पु.ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, उच्च व तंत्र शिक्षण (ग्रंथालय) विभाग आणि माहिती व जनसंपर्क महासंचालनालय यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा पंधरवडानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
मंत्रालयाच्या त्रिमूर्ती प्रांगणात या पंधरवड्याचे मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते दीपप्रज्ज्वलनाने उद्घाटन करण्यात आले. यावेळी मराठी भाषा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम, मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे, उपस्थित होते. यावेळी मराठी भाषेसाठी वेगवेगळ्या प्रकारे योगदान देणाऱ्या मंत्रालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना गौरविण्यात आले.
मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्ताने राज्य शासनाच्यावतीने ग्रंथप्रदर्शन, अभिवाचन स्पर्धा आणि मराठी प्रश्नमंजुषा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि.14 ते 28 जानेवारी 2021 या कालावधीत हा पंधरवडा साजरा केला जाणार आहे.
सुभाष देसाई म्हणाले, मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी मराठी भाषेला पुढे नेण्यासाठी कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्यासाठी काही ना काही लिखाण करीत आहेत. ही मंत्रालयाला लाभलेली प्रदीर्घ परंपरा आहे. मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही परंपरा पुढेही चालू ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
मंत्रालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जी पुस्तके लिहिली आहेत त्याचे प्रदर्शन मराठी भाषा पंधरवड्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत ठेवण्यात येईल. या प्रदर्शनाच्या माध्यमातून इतरांनाही प्रेरणा मिळेल. मराठी भाषा विभागातर्फे या कामासाठी पुरस्कार देण्यात आले आहेत. त्यांना आजपासून मराठी भाषेचे अग्रदुत म्हणून गणले जाईल, असेही त्यांनी सांगितले.
प्रत्येक विभागात कारभार मराठीत झाला पाहिजे बॅंक, पोस्ट, रेल्वे या ठिकाणी मराठी भाषेमधून व्यवहार व्हावा यासाठी आग्रह धरला पाहिजे. राज्यातील केंद्र सरकारच्या कार्यालयातील कारभार मराठी भाषेतून व्हावा असे केंद्र सरकारचे धोरण आहे. या धोरणाचा त्या ठिकाणी प्राधान्याने वापर व्हावा. केंद्रीय कार्यालयात दर्शनी भागावर मराठीमध्ये फलक लावण्यात यावे, असेही देसाई यांनी सांगितले.
विश्वजित कदम म्हणाले, मराठी भाषेचा प्रचंड मोठा इतिहास आहे. संत ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहून महाराष्ट्राचेच नव्हे तर भारताचे वेगळे स्थान निर्माण केले. मराठी भाषा विभागाच्या वतीने मराठी भाषेला जागतिक स्तरावर नेण्याचे काम केले जात आहे.
“निलांबरी’ फिरते ग्रंथ प्रदर्शन
“निलांबरी’ बसमधील फिरत्या ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन सुभाष देसाई व डॉ. विश्वजित कदम यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. भाषा संचालनालयाचा परिभाषा कोश, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ आणि शासकीय मुद्रणालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या पुस्तकांचे प्रदर्शन आगळ्यावेगळ्या स्वरुपात असणार आहे. “बेस्टच्या निलांबरी’ बसमध्ये हे फिरते प्रदर्शन असणार आहे.