छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची भाजपला सुचना
नागपुर – भाजपचे नेते महाराष्ट्रातील प्रचारात कलम 370 चे भांडवल करीत आहे. ते जर या मुद्द्याचेच भांडवल करणार असतील तर त्यांनी पुलवामात भारतीय जवानांवर झालेल्या हल्ल्यावरही बोलले पाहिजे अशी सुचना छत्तीसगडचे मुख्यमंत्री भुपेश बाघेल यांनी केली आहे. ते महाराष्ट्रातील निवडणुकीत कॉंग्रेसच्या प्रचारासाठी आले असून आज येथे एका पत्रकार परिषदेत बोलतान त्यांनी ही सुचना केली.
सरकारच्या आर्थिक धोरणावर टीका करून ते म्हणाले की त्यांच्या चुकीच्या धोरणामुळेच देशात मंदीचे वातावरण आहे पण असे असले तरी योग्य धोरणे राबवून छत्तीसगड मध्ये मात्र उत्तम अर्थिक प्रगती साधली आहे. जे आम्हाला जमते ते मोदी सरकारला का जमू शकत नाहीं असा सवालही त्यांनी केला. पुलवामात दहशतवाद्यांनी स्फोट घडवून सीआरपीएफच्या चाळीस जवानांचा बळी घेतला आहे.
त्या स्फोटाची सरकार कधी चौकशी करणार आहे असा सवाल त्यांनी केला. ज्या रस्त्यावर जिथे पक्षी सुद्धा उडू शकत नाहीं त्या भागात अडीचशे किलो आरडीएक्स कोठून आले असा सवाल त्यांनी केला. या घटनेला जबाबदार कोण याचे उत्तर मिळाले पाहिजे असे त्यांनी नमूद केले. नोटबंदी सारखा पुलवामा हल्ला प्रकरणाचाही तपशील सरकारने दडवून ठेवल्याचा दावा त्यांनी केला.
नोटबंदीच्या सुरूवातीच्या काळात नेमके किती नोटा परत आल्या याची माहिती सरकारने दडवून ठेवली होती तसाच प्रकार त्यांनी पुलवामा हल्ला कसा झाला याविषयीही केला आहे. लोकसभा निवडणुकीच्या काळात शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करू अशी ग्वाही सरकारने दिली होती पण मग महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कसे वाढले असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आपल्या राज्यात शेतकऱ्यांना चांगला भाव दिला जात असून आम्ही 20 हजार कोटी रूपयांची धान्य खरेदी करून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पैसे भरले. देशात वाहन उद्योग क्षेत्रात 19 टक्के घट झाली असताना आमच्या राज्यात मात्र वाहन उद्योग क्षेत्रात 11 टक्के इतकी वाढ झाली आहे असेही बाघेल यांनी यावेळी नमूद केले.