पुणे: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष सौरव गांगुली पदभार स्वीकारल्यानंतर रोज नवनव्या घोषणा करत आहेत. मंडळाचे मुख्यालय मुंबईत असूनही राज्यातील माध्यमांशी बोलताना संदिग्ध विधाने करायची आणि सगळ्या घोषणा व निर्णय कोलकत्यातून जाहीर करायचे हेच घडत आहे. इतकेच नाही तर मंडळाच्या नव्या घटनेचा अभ्यास न करताच माध्यमांशी बोलताना संभ्र निर्माण करत असल्याने पत्रकारांनाच त्यांच्या या गुगलीवर बाद व्हावे लागत आहे. मंडळात तसेच सभासदांशी चर्चा करताना गांगुली संदीग्ध बोलत असल्याची माहिती मंडळातील एका सदस्याने दै. प्रभातशी बोलताना आपले नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.
मंडळाचे अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर दिवसरात्र कसोटी सामन्याचे आयोजन वगळता गांगुली यांनी मंडळाच्या कोणत्याच गोष्टींवर स्पष्ट वक्तव्य केलेले नाही. मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच झाली. त्यानंतर कर्नाटक प्रीमिअर लीगमधील (केपीएल) सट्टेबाजी असो, निवड समितीच्या सदस्यांचा कार्यकाळ असो, गुणलेखकांचा प्रश्न असो, घटनेचा कोणताही अभ्यास न करता केवळ अनाकलनीय बातम्यांची केवळ पेरणी केली जात आहे.
सध्याच्या निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद व सदस्य गगन खोडा यांचा कार्यकाळ जुन्या घटनेनुसार संपणार की नव्या घटनेनुसार अजुन एक वर्ष त्यांची मुदत राहणार याबाबतही गांगुली यांनी थेट भाष्य केलेले नाही. वार्षिक सभेनंतर पत्रकारांनी प्रसाद यांच्या मुदतीबाबत विचारणा केल्यावर थेट भाष्य न करता ज्यांची मुदत संपते त्यांना मुदतवाढ देण्याचा प्रश्नच येत नाही असे गांगुली यांनी सांगितले. मात्र त्यात प्रसाद व खोडा यांपैकी एकाचेही नाव घेतले नाही. एमएसके प्रसाद आणि गगन खोडा 2015 साली निवड समितीवर नियुक्त झाले. जतीन परांजपे, शरणदीप सिंग आणि देवांग गांधी 2016 मध्ये सदस्य बनले.