नाणे मावळ – नाणे मावळ काही ठिकाणी शेतकऱ्यांनी खरीपातील भात पिकांची सर्व कामे आटोपून गहू, ज्वारी आदी पिकांची पेरणी करत रब्बी हंगामास सुरुवात केली आहे. शेतकरी बांधव पारपरीक पद्धतीने नागरणी झाल्यानंतर रब्बी हंगामास सुरुवात करत असतानाचे चित्र सध्या दिसत आहे. त्यात थंडीची सुद्धा सुरुवात झाल्याने गुलाबी थंडी रब्बी हंगामातील पिकासाठी पोषक ठरत आहे.
राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्याने तेथील खरीप आणि रब्बी हंगाम धोक्यात आले आहेत. मात्र मावळ तालुक्यात दरवर्षीप्रमाणे भरभरून पाऊस झाल्याने शेतकरी आनंदात होते. खरीपाचे पीक काढलीला सुरवात झाली असता अचानक आलेल्या अवकाळी पावसाने तोंडचा घास हिरावला. खरीप हंगामासाठी हा पाऊस काळ ठरला असला तरी रब्बीच्या पिकांसाठी तो वरदान ठरत आहे. उशिरा पावसाळा सुरू झाल्याने खरीप हंगामातील भात लागवडीस देखील उशिरा सुरुवात झाली. यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक होते. त्यामुळे यंदाच्या वर्षी शेतकऱ्याच्या घरी सोन्याची भाकर अपेक्षित होती. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा अपेक्षाभंग केला. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांना भात कापणीस उशिरा सुरुवात करावी लागली. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांच्या पेरण्यास सुद्या उशिरा सुरुवात होत आहे. नाणे मावळात पावसाने मागील दिवसापूर्वी पाऊस झाला. हा पाऊस रब्बीच्या पिकांसाठी पोषक ठरत आहे. तसेच गुलाबी थंडीत हिरवेगार पीक डोळ्यांना आल्हाददायक ठरत आहे.
रासायनिक खतांचा व औषधांचा वापर गरजेपेक्षा जास्त शेतकरी बांधव आपल्या शेतामध्ये करीत असतात. मात्र त्याचा कुठे ना कुठेतरी त्याचा परिणाम हा आपल्या जीवनावर होत असतो. त्याच बरोबर आजारालाही निमंत्रण देत असताना देखील काही शेतकरी बांधव त्याकडे काना डोळा करीत भरघोस उत्पादनासाठी रासायनिक खतांचा वापर करीत आहेत. ठराविक शेतकरी आजही सेंद्रिय शेती करीत आहेत. नाणे मावळातील प्रत्येक शेतकरी बांधवानी सेंद्रिय शेतीला प्राधान्य द्यावे.
– दत्तात्रय वाल्हेकर, पोलीस पाटील, नाणे (सिंगल फोटो)
खरीपातील भात आणि रब्बीतील गहू, ज्वारी, हरबरा पिकांसाठी शेणखत, कोंबडी खत, गांडूळखत, लेंडी खत अशा प्रकारच्या नैसर्गिक खतांचा वापर शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणत करावा. बाजारात सेंद्रीय शेतमालाला मागणी असल्याने सेंद्रिय भात ही नाणे मावळाची ओळख करण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न करणार आहोत.
– वैशाली संदीप कुटे, सरपंच, करंजगाव (सिंगल फोटो)