– अरुण गोखले
नळाखाली भरायला लावलेली बादली ही पाच नाहीतर दहा मिनिटांत तरी भरते. नुसती भरत नाही तर कधी कधी ओसंडून सांडतेही. पण आम्ही आयुष्यभर काबाडकष्ट केले, प्रयत्नांची पराकाष्ठा केली, कितीही घाम गाळला, अनेक खटपटी लटपटी केल्या तरीसुद्धा आमची जीवनाची बादली ही मात्र सुखा समाधानाने, तृप्तीने का भरत नाही?
या आणि अशा साधकांच्या प्रश्नाचे उत्तर देताना महाराज म्हणतात, “बाबांनो! तुमची शंका, तुमचा प्रश्न हा अगदी रास्त आहे. कारण, सुखाच्या प्राप्तीसाठी धडपडला नाही तर तो माणूस कसला. इथं तर या संसार प्रपंचात आपल्या प्रत्येकाची हीच इच्छा असते. आपण आपापल्या परीने ती जीवनाची बादली सुखासमाधानाने भरून घेण्याचा प्रामाणिक प्रयत्नही करत असतो. यात कोणतेच दुमत आही. तरीही इथे एक प्रश्न शिल्लक राहतोच की आमची ती बादली मात्र का भरत नाही?
त्या प्रश्नाचं उत्तर एकच आहे की बाबारे! तू ज्या बादलीत ते सुख ते समाधान हे साठवू पाहतो आहेस ना? ती बादली फुटकी आहे, गळकी आहे. त्या बादलीला वृत्तीची भोकं पडलेली आहेत. ज्याप्रमाणे भोकं पडलेल्या पात्रातले पाणी हे हळूहळू गळून जाते आणि ते पात्र पुन्हा रिकामे किंवा कोरडेच होते. तशीच अवस्था या आपल्या जीवनरूपी बादलीची आहे. या आपल्या बादलीला वृत्तीची, असमाधानाची, अतृप्तीची भोकं पडलेली आहेत.
मानवी मनातल्या वृत्ती या स्थल, काळ, वेळ, प्रसंग, वास्तू आणि व्यक्ती यानुसार सतत बदलत असतात. आपल्या मनातील सुखा समाधानाच्या कल्पना आणि त्यांची साधने यात ही सतत बदल होत असतो. कालची सुखदायक वस्तू आज आपल्याला नकोशी वाटते. कालच्यापेक्षा आज जास्त सुख हवं, पैसा हवा, चैनीच्या, आनंदाच्या नवनव्या वस्तू हव्यात. ही जी आपली अपेक्षा असते ना? त्या अपेक्षांची, अतृप्तीची, असमाधानाची, हावेची, स्वार्थ आणि लोभाची छिद्रे पडलेली आहेत.
त्यातून जे आहे, जे मिळालेले आहे तेसुद्धा सुख समाधान हे गळून जाते आणि खाली शिल्लक राहते ती रिकामी बादली. आपली ही जीवनरूपी फुटकी बादली साधू, संत आणि सद्गुरू यांच्या बोधाने जोडून घ्यावी लागते.तिची वृत्तीची भोकं बुजवून घ्यावी लागतात. आपल्या चंचल वृत्ती या स्थिर करून समाधानाचं सुख हे आपलं आपणच शोधावं लागतं.