सातारा – मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता रवींद्र महाजनी यांचे निधन झाल्याचे शनिवारी उघडकीस आल्यानंतर साताऱ्यात हळहळ व्यक्त करण्यात आली. महाजनी कुटुंब मूळचे साताऱ्याचे असल्यामुळे त्यांच्याविषयीच्या आठवणीही जाग्या झाल्या. मात्र, रवींद्र महाजनी यांचे एकाकी जाणे अनेकांना अस्वस्थ करून गेले.
मराठी चित्रपटसृष्टीतील विनोद खन्ना अशी ओळख असलेला अभिनेता रवींद्र महाजनी आज शनिवारी रसिकांच्या मनाला चटका लावून गेला. मराठीतील एक देखणा नट म्हणून रवींद्र महाजनी लोकप्रिय झाले. मराठी, हिंदी, गुजराती चित्रपटांमधून भूमिका साकारून त्यांनी आपल्या अभिनयाची छाप साऱ्या जगावर पाडली. लक्ष्मीकांत बेर्डे आणि असोक सराफ या जोडीने मराठी चित्रपटांच्या कथानकाला एकूणच कलाटणी दिली. मात्र, त्याकाळात हिरो म्हणून या देखण्या रवींद्र महाजनींचीच मोहिनी रसिकांच्या मनावर होती.
हे रवींद्र महाजनी मूळचे साताऱ्याचे. लोकसत्ताचे संपादक ह. रा. महाजनी यांचे रवींद्र हे चिरंजीव. सातारा शहरातील मंगळवार पेठेत त्यांचे घर होते. परंतु, ह. रा. महाजनी मुंबईला गेले. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे काही निमित्तानेच सातारला येणेजाणे होते.
साताऱ्यातील क्रीडा क्षेत्रातील संघटक सुरेश महाजनी यांनी त्यांच्या आठवणी जागविल्या. सुरेश महाजनी व त्यांचा भाऊ काही काळ शिक्षणासाठी मुंबईत होते. त्यावेळी ते या महाजनी कुटुंबाकडे जात होते. रवींद्र महाजनी तंचे समवयस्क. ही सारी भावंडे त्यांना पिट्या म्हणत असतं, अशी आठवणही त्यांनी सांगितली. व्ही. शांताराम यांनी दिग्दर्शित केलेल्या झुंज या मराठी चित्रपटाद्वारे त्यांनी चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले.
लक्ष्मी, दुनिया करी सलाम, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, देवता अशा अनेक चित्रपटांतून रवींद्र महाजनी यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटविला. त्यांचे चिरंजीव गश्मीर महाजनी नायक असलेला देऊळबंद चित्रपट काही वर्षांपूर्वी आला. त्यातही रवींद् महाजनी यांची छोटी भूमिका होती. सत्तेसाठी काहीही या चित्रपटाचे निर्माता आणि दिग्दर्शक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. या देखण्या कलावंतांचा एकाकी मत्यू मात्र सर्वांनाच चटका लावून गेला.