सोमेश्वरनगर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात संचारबंदी व जमावबंदी केली असताना विनाकारण गावात रस्त्यावर फिरणा-या युककांना, नागरिकांना पोलिसांनी काठीचा चोप सुरू केल्याने सोमेश्वरनगर परिसरात संचारबंदीचा खरा नियम लागू झाल्याचे चित्र हे सकाळ पासून दिसून येत आहे.
सोमेश्वरनगर परिसरात रविवारी जनता कर्फ्यूला दिलेल्या प्रतिसादानंतर सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यात संचारबंदीचा आदेश जारी केला. मात्र, यानंतरही सोमेश्वरनगर मध्ये बऱ्याच ठिकाणी चारचाकी, दुचाकींचा वावर जास्त होताना दिसत होता; परंतु दुपारी नंतर वाहने व नागरिकांची रस्त्यावर गर्दी वाढण्याची शक्यता होत असल्याने वडगांव निबांलकर पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ लांडे व कर्मचारी यांनी विनाकारण फिरणारी वाहने अडवून काही वाहनचालकांना तंबी दिली व काहींना लाठीचा चोप दिल्याने वाहनचालकांमध्ये धांदल उडाली होती.
पोलिसांचा चोप सुरू असल्याचे पाहून पाठीमागून व समोरच्या बाजूने येणारी वाहने माघारी फिरून जात होती. काही नागरिक दुचाकीवरून लहान मुलांना घेऊन फिरत असताना दिसत होते.