मुंबई – देशात अनेक ठिकाणी वेबसाईट हॅक करण्याचे प्रकार समोर आले आहेत. महाराष्ट्रातही असे काही प्रकार समोर आले असून महाराष्ट्र सायबर सेलचे प्रमुख एडीजी मधुकर पांडे याविषयची अधिकची माहिती माध्यमांना देतील. राज्य सरकारच्यावतीने या सर्व गोष्टींचा आढावा घेण्यात आला आहे. तसेच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासंदर्भात सर्व यंत्रणा कार्यरत असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिली. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मंगळवारी(दि.14) राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेश कार्यालयात माध्यमांशी संवाद साधला.
गृहमंत्री पुढे म्हणाले, आपल्या देशात समाजासमाजात द्वेष पसरविण्याचे काम सुरू आहे, त्याला प्रतिकार म्हणून समाजातील काही टोकाचा विचार करणाऱ्या लोकांकडून अशाप्रकारची कृती होत आहे. ही बाब बरोबर नाही. सगळ्यांना सलोख्याने राहायचे असेल तर एकमेकांच्या अडचणी, भावना समजून घेणे गरजेचे आहे, असे आवाहन गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी राज्यातील तसेच देशातील जनतेला केले आहे. परंतु ज्या प्रकारे आज भारताविरोधात काही देश अपील करत आहेत, त्यातून सर्वांचे नुकसान होईल. त्यामुळे अशा गोष्टींपासून सर्वांनी दूर राहावे, असे आवाहनही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी केले.
कारवाईबाबत पंतप्रधानांनी निर्णय घ्यावा…
प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल जे उद्गार काढले गेले त्यासंदर्भात देशाच्या प्रमुखांनी माफी मागितली पाहीजे, अशी मागणी काही देशांकडून होतेय. वास्तविक जे उद्गार काढले गेले, त्यावर अनेक ठिकाणी गुन्हे दाखल झाले असून कारवाई सुरु आहे. त्यासंदर्भात काय निर्णय घ्यायचा, हे पंतप्रधान यांनी स्वतः ठरविले पाहीजे, अशी भूमिकाही गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मांडली.
तसेच याच अनुषंगाने मागील शुक्रवारी महाराष्ट्र काही ठिकाणी नमाज नंतर आंदोलने झाली होती. या आठवड्यात अशी घटना घडू नये, यासाठी राज्यातील पोलिसांना सतर्क करण्यात आले आहे. पोलीस विभाग कायदा व सुव्यवस्थेचे पालन कसे होईल, याची काळजी घेतील.