मुंबई – देशात सध्या मंदिर-मशिदीवरुन धार्मिक वाद सुरू आहेत. हा विषय काढून राज्यामध्ये एक प्रकारची अस्वस्थता निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू आहे. या गोष्टीला इतके महत्त्व देता कामा नये. हजारो वर्षांपूर्वी ज्या गोष्टी घडल्या त्या आधारावर आता धार्मिक वाद निर्माण करुन एक अस्थिर वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे. हे सर्व निषेधार्ह असून पोलिसही याचा गांभीर्याने तपास करत आहेत, अशी प्रतिक्रिया राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी विविध विषयांवर माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. मनसेकडून शरद पवार आणि बृजभूषण सिंह यांचा एक जुना फोटो व्हायरल करण्यात येत आहे. यावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार हे अनेक वर्षांपासून राज्य कुस्तीगीर संघटनेचे प्रमुख आहेत. बृजभूषण सिंह हे सुद्धा भारतीय कुस्ती महासंघाचे पदाधिकारी आहेत. कुस्ती स्पर्धेच्या आयोजनातला हा जुना फोटो आहे. फोटोच्या मागील बॅनरवर कुस्ती कार्यक्रमाचा स्पष्ट उल्लेख आहे. त्यामुळे त्या फोटोचा राजकीय संबंध लावायचे कारण नाही, असे त्यांनी सांगितले.
ओबीसी आरक्षणासाठी सत्तेतील काही पक्ष आग्रही नाहीत, असा गैरसमज प्रसारमाध्यमांद्वारे केला गेला. त्यावर दिलीप वळसे पाटील यांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, सर्वच पक्षांचा ओबीसी समाजाला आरक्षण मिळावे असा आग्रह आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी स्वत: सर्वोच्च न्यायालयापर्यंत जाऊन त्यासंदर्भात केसेस लढवल्या आहेत.
निवडणूक आयोगाने स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला असला तरी प्रत्यक्ष निवडणुका होण्यापूर्वी ओबीसी आरक्षण जाहीर झालेले असेल. त्यासाठी आवश्यक इम्पिरिकल डाटा सर्वोच्च न्यायालयाला देऊन मध्य प्रदेशासाठी ज्याप्रकारे निकाल आला, तसाच निकाल महाराष्ट्रासाठीही सर्वोच्च न्यायालयाकडून घेऊन अंतिमत: ओबीसी वर्गालाही येणाऱ्या निवडणूक प्रक्रियेत योग्यरित्या समाविष्ट केले जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.