पुणे – मध्यंतरी काही जणांमुळे महाराष्ट्र पोलिसांच्या नावलौकिकास बट्टा लागला, असे वक्तव्य गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी व्यक्त केली. महाविकास आघाडीच्या काळात मोक्याच्या ठिकाणी बदली करुन घेण्यासाठी गैरप्रकार, भष्ट्राचार झाले होते. मात्र,भाजप-शिंदे सरकारकडून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या नियमानुसार आणि पारदर्शकपणे करण्यात आल्या आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले.
पोलीस संशोधन केंद्रात शनिवारी वार्षिक गुन्हेगारी आढावा बैठक पार पडली. यावेळी राज्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत फडणवीस यांनी वार्षिक गुन्हेगाराची आढावा घेतला. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी राज्याचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत पोलिस अधिकाऱ्यांना काही सूचना देण्यात आल्या आहेत.
गंभीर गुन्ह्यांतील आरोपींना जास्तीत जास्त शिक्षा होण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. त्यादृष्टीने पोलिसांनी तपास करत न्यायालयात कागदपत्रे आणि सबळ पुरावे सादर करावेत. महाराष्ट्र कायदा आणि सुव्यवस्थेत अव्वल आहे. दोन गटातील वाद तसेच जातीय तणावाच्या घटना टाळण्याचे आदेश पोलिसांना देण्यात आले आहेत. मोर्चे, आंदोलनांवरही पोलिसांची नजर आहे. दरम्यान, अमली पदार्थ विक्रीच्या विरोधात पोलिसांनी विशेष मोहीम हाती घेण्याचे आदेश देण्यात
आले आहेत, असे फडणवीस नमूद केले.
पुणे पोलिसांचा सन्मान
पोलिसिंगमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणाऱ्या पुणे पोलिसांना सर्वोकृष्ट पोलीस घटक पारितोषिकाने सन्मान करण्यात आला. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुण्याचे तत्कालीन आयुक्त तथा अपर पोलीस महासंचालक (कारागृह) अमिताभ गुप्ता यांना पारितोषिक प्रदान करुन सन्मानित करण्यात आले.