आपण ज्याला “विकास’ म्हणतो, त्याची व्याख्या नेमकी कोणती? राजकीय पक्ष “विकासाचा अजेंडा’ म्हणजे नेमकं काय घेऊन आपल्यासमोर येतात? जो काही विकास होतो, तो किती लोकांपर्यंत पोहोचतो? ऑक्सफॅमचा ताजा अहवाल तर असं सांगतो की, 62 टक्के संपत्ती केवळ पाच टक्के लोकांच्या हातात आहे. देशातल्या 21 अब्जाधीशांकडे जेवढी संपत्ती आहे ती 70 टक्के लोकसंख्येकडे असणाऱ्या संपत्तीपेक्षा जास्त आहे. संपत्ती निर्माण होतीये; पण ती मूठभरांच्या हातात केंद्रित होतीये, याचाच अर्थ विकास नावानं जी प्रक्रिया आपण आजमितीस स्वीकारली आहे, ती संपूर्ण मानवजातीच्या विकासाचं प्रतिनिधित्व करत नाही.
माणूस जर माणसालाच विकासाचा वाटा देणार नसेल, तर तो विकास नावाच्या प्रक्रियेत मानवेतर सजीवांचा काय विचार करणार? जंगलांचं आच्छादन कमी होणं आणि प्राणिमात्रांचे अधिवास, अन्न, स्थलांतरवाटा आणि भ्रमणमार्ग संपुष्टात येणं ही “अपरिहार्यता’ म्हणून मानवेतर सजीवांच्या डोक्यावर थापली जाणार, हे उघड आहे. विकास हवा असेल, तर त्यासाठी पायाभूत संरचना सुदृढ होणं ही पूर्वअट मानली गेलीये. म्हणजे, सहा-आठपदरी रस्ते, पूल, उड्डाणपूल इत्यादी. या सुविधांच्या उभारणीमुळे कुणाच्या दैनंदिन जीवनात प्रचंड उलथापालथ होत असेल, तर तीही “अपरिहार्यता’च होय. ती स्वीकारणं जिथे माणसाला भाग पडतं, तिथं पशूंची काय कथा! विकासाच्या गतिमान एक्सप्रेसमध्ये मुक्या जीवांना स्थान मिळणं, हे दिवास्वप्नच!
खरं तर इसापनीतीपासून आजकालच्या मोटिव्हेशनल स्पीचेसपर्यंत सर्वत्र चतुष्पाद प्राण्यांनी भरपूर रसायन दिलंय. प्राण्यांकडून माणूस पूर्वीही शिकत होता आणि आजही शिकतोय; पण प्राण्यांना त्यांची “स्पेस’ द्यायला आपण तयार नाही. प्राण्यांकडून ज्ञान घेऊन त्यांचाच सर्वनाश करायला टपलेल्या मनुष्यप्राण्याविषयी प्राणिजगतात काय-काय बोललं जात असेल! प्राण्यांनी वर्षानुवर्षे ज्या स्थलांतरवाटा तुडवल्या, तिथंच माणसाला फ्लायओव्हर हवाय. पुलाचे कठडे भक्कम आणि भरीव हवेत. मग प्राण्यांना पलीकडचं दिसलं नाही आणि गैरसमजातून त्यांनी कठड्यावरून उडी टाकली तरी बेहत्तर! सोलापूरजवळ अशा घटनेत बारा काळविटांचा जीव गेला. मागे कुत्री लागली असतील नाहीतर वाहनांच्या आवाजानं ती बुजली असतील.
कठड्यापलीकडे असलेला मृत्यू त्यांना दिसला नाही, हे वास्तव. केगाव-हत्तूर बाह्यवळणावर पूर्वीही अशी घटना घडली होती आणि प्राणिमित्रांनी त्यावर उपाययोजना करण्याची मागणी केली होती. साताऱ्याजवळच्या हायवेवर एकाच ठिकाणी दोन बिबटे वर्षाच्या अंतरानं मरून पडले. “अज्ञात वाहनाची धडक’ म्हणून वनखात्यानं फाइल क्लोज केली. माणसानं घडवलेले बदल मुक्या जीवांनी बिनबोभाट स्वीकारले पाहिजेत आणि आपल्या वाटा बदलल्या पाहिजेत, अशी अपेक्षा आहे का? हक्क न सांगणाऱ्यांचासुद्धा हक्क हिसकावणं विकासाच्या कुठल्या व्याख्येत बसतं?
“मानव-वन्यजीव संघर्ष’ असं लेबल लावून आपण अशा घटनांवर पांघरूण घालतो आहोत का? कुणामुळे सुरू झाला हा संघर्ष? विकासाचं नवीन काम सुरू करताना जो अभ्यास केला जातो, त्यात परिसरविज्ञानाला स्थान असतं का? की हे विज्ञानच नाही? आपल्याला आपला मार्ग प्रशस्त करायचा आहे आणि त्या वाटेत जो येईल त्याला आडवं करायचंय. आपल्याला जमिनीपासून नैसर्गिक साधनसंपत्तीपर्यंत सगळ्यावर आपला हक्क सांगायचाय. सगळं ओरबाडून घ्यायचंय. बाकी कुणी जगायचंच नाही!