एकीकडे अहिंसेचे शस्त्र हाती घेऊन परकियांशी लढणारे, तर दुसरीकडे स्वतःच्या आचरणातून भारतीय समाज सुधारणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे महात्मा गांधी. आज 30 जानेवारी रोजी महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्ताने विशेष लेख.
हिंदू मुस्लीम शिख इसाई
हम है सारें भाई भाई…
असा मानवतेचा संदेश देणारे आणि त्यासाठी आत्मबलिदान देण्यास तत्पर असणारे महात्मा गांधी म्हणजे कणखर मनोबलाचा असामान्य माणूस होय. त्यांनी भारतीय जनतेच्या अंतःकरणात विविध संप्रदायातील साधू, संत यांनी निर्माण केलेल्या विश्वबंधुत्वाच्या विचारांची पेरणी केली. त्या आधारावर त्यांनी हिंदू-मुस्लीम आणि स्पृश्य-अस्पृश्य अशा सर्व जातीजमातींचा, विविध धर्मांचा पाठिंबा मिळविला. टिळक युगाच्या अस्तानंतर खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व केले ते महात्मा गांधींनी. सर्वसामान्य जनतेला दैनंदिन जीवनात ज्या साध्या आणि क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टी होत्या, त्या मीठ, चरखा, कापूस, खादी, शेळीचे दूध या सारख्या गोष्टींमधून गांधीजींनी भारतीय जनतेच्या मनात स्वातंत्र्याचे बीज अंकुरले. खरं तर तत्कालीन परिस्थितीचा अभ्यास केला तर हे अवघड आणि अशक्य असणारे काम त्यांनी सहजपणे केले. त्यासाठी त्यांनी अविरतपणे कष्ट, सोशिकता, अहिंसक वृत्ती आणि परस्परातील स्नेहभाव, सौहार्दाचे आयुष्यभर निष्ठेने पालन केले. महान त्यागाचे मूर्तिमंत प्रतीक म्हणजे महात्मा गांधी होत.
हा महात्मा गांधी नामक हाडामांसाचा कुणी या पृथ्वीतलावर आला आहे, यावर पुढील पिढ्यांचा विश्वास बसणे अशक्य आहे, असे मत शास्त्रज्ञ अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी व्यक्त केले आहे. महात्मा गांधींच्या निधनाला 74 वर्षें होत आली, तरी अल्बर्ट आइन्स्टाइन यांनी व्यक्त केलेले वरील मत आजही महत्त्वाचे ठरते.
पोरबंदर संस्थानात नोकरीच्या निमित्ताने वास्तव्य करणाऱ्या करमचंद गांधी यांची घरची परिस्थिती अतिशय उत्तम म्हणावी अशी होती. अर्थात, त्यामुळे वकिलीपर्यंतचे शिक्षण घेणारे मोहनदास गांधी यांनी “बॅरिस्टर’ची पदवी आत्मसात केली. मात्र, या संपूर्ण जीवन प्रवासात ते नेहमीच नावीन्यपूर्ण प्रयोग करीत राहिले. माणूसपण जपण्यासाठी ते नेहमीच आग्रही असायचे. वकिलीच्या कामासाठी दक्षिण आफ्रिकेत गेले तेव्हा त्यांना तेथे काळा-गोरा हा भेदभाव प्रकर्षाने दिसून आला. माणसाच्या जगण्याचा हक्क डावलला जातोय, नव्हे तर नाकारला जातोय, हे पाहून ते मनस्वी व्याकूळ झाले. मात्र, केवळ हळहळ व्यक्त न करता त्यांनी या मूलभूत अधिकाराच्या प्रश्नांवर लढायचे ठरवले. त्यांनी त्यासाठी सविनय कायदेभंग आणि अहिंसा यासारखा मार्ग पत्करला.
पुढे भारतात आल्यावर बॅरिस्टर गोपाळकृष्ण गोखले यांच्यासारखा “गुरू’ त्यांना लाभला. त्यांच्या मार्गदर्शनानुसार संपूर्ण भारताच्या प्रत्यक्ष परिस्थितीची जाणीव करून घेण्याचे त्यांनी ठरविले. संपूर्ण भारत भ्रमंती करून परिपक्व झालेले महात्मा गांधी यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी अतूट निश्चयाने आणि दृढ बळाने प्रेरित होऊन स्वातंत्र्यलढ्यात उतरले. महात्मा गांधींच्या हाकेसरशी स्वातंत्र्यलढ्याच्या होमकुंडात हसत हसत उडी घेणारी अख्खी पिढी पुढे आली. त्यासाठी सर्वसामान्यांच्या मनावर ताबा मिळवण्यासाठी अथक प्रयत्नाने ते त्यात यशस्वी झाले. “बापू’ या टोपणनावाने ते अखंड भारत वर्षात लोकप्रिय झाले होते.
ब्रिटिशांना “चले जाव’ म्हणून सांगणारी निधडी छाती आणि धैर्य पाहून गांधीजींच्या बाबतीत, विशेषतः त्यांच्या अहिंसक वृत्तीविषयी हेटाळणी करणाऱ्यांना थेट उत्तर मिळाले होते. त्यांच्या संपूर्ण जीवन प्रवासात त्यांनी सत्याचा आग्रह धरला आणि अहिंसेच्या तत्त्वावर त्यांनी कधीच तडजोड केली नाही. सत्य, न्याय, अहिंसा, अपरिग्रह, सर्वधर्मसमभाव, समता, बंधुता, ही मूल्ये कायमपणे स्वीकारून त्यांनी राजकारणाला एक उत्तुंग अशी उंची मिळवून दिली. ते “हरिजन’ या आपल्या वृत्तपत्रातून सातत्याने दीनदलितांविषयीचे लिखाण करीत असत. मानवतावादाचा प्रसार, स्त्रियांचे प्रश्न, अस्पृश्यतावादाचा नाश, स्वदेशीचा पुरस्कार, जनतेच्या पैशाचा सुयोग्य विनिमय, अंतर्बाह्य शुद्धता, शुद्ध व सात्त्विक आहार विहार, पवित्र आचारविचार, प्रखर देशभक्ती, दया व करुणा यांचा संगम, सामान्यांच्या असामान्य कामगिरीवर दृढविश्वास, भ्रष्टाचाराला कठोर विरोध, सत्तेचे विकेंद्रीकरण, खेड्याकडे चला, स्वयंपूर्ण खेडे, दलित-अस्पृश्यांविषयी उद्धाराची तळमळ, सर्वदूर शिक्षण प्रसार, निसर्गोपचार आणि त्याचे महत्त्व, अहिंसा म्हणजे भ्याडपणा नव्हे आदी विविध गुणवैशिष्ट्यांमुळे गांधीजी अगदी तळागाळापर्यंत पोहोचले. अंत्योदय हा त्यांचा श्वास होता.
15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वातंत्र्याची पहाट अनुभवत होता; या जल्लोषात न राहता फाळणीच्या वेदना आणि अश्रू पुसण्यासाठी हा कृश देहयष्टीचा महात्मा कणखर मनोबलाच्या जोरावर नौखालीत फिरत होता. नेल्सन मंडेला सारखा प्रखर गांधीवादी नेता आपल्या लढ्याला गांधीवादी विचारांची जोड देऊन प्रखर लढा देऊन विजयी होतो आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवतो, तो दिवस गांधी विचारांची सरशी ठरणारा ठरतो; महात्मा गांधीजींना दिलेली ती खरी आदरांजली ठरते. भारताला महात्मा गांधी यांनी दिलेल्या स्वराज्याचे सुराज्यात रूपांतर व्हावे, ही अपेक्षा ठेवणे गैर नाही. त्यादृष्टीने महात्मा गांधी यांच्या विचारांचा वेध घेऊन वाटचाल करणे हीच खरी बापूजींना त्यांच्या पुण्यस्मृतीदिनी आदरांजली ठरेल.