– निरंजन भावसार
भौगोलिक, सांस्कृतिक, भाषिक भिन्नता असलेल्या भारताला आज विचाराने अधिक समृद्ध होण्यासाठी आवश्यकता आहे ती वेगाने संस्कृतीकरण वाढण्याची. संस्कृतीकरण या संकल्पनेबाबत…
वाढते औद्योगिकीकरण, नागरीकरण व आधुनिक शिक्षण यांच्या प्रभावामुळे ग्रामीण संस्कृतीत नवनवीन परिवर्तन घडून येत आहेत. ग्रामीण जीवन एकसारखे बदलत आहे. आदिम जातीतही असेच परिवर्तन घडून येत आहे. त्या परिवर्तनाचे स्वरूप बहुमुखी आहे. त्याच्या अनेक प्रक्रिया आहेत. त्यापैकी पारस्परिक सांस्कृतिक परिवर्तन ही एक प्रक्रिया आहे. दोन किंवा अनेक संस्कृती एकमेकांच्या संपर्कात आल्या की त्यांचा परस्परांवर प्रभाव पडतो हे स्वाभाविकच असते. तसेच एकाच संस्कृतीत जे उच्च-नीच स्तर असतात त्यांचाही परस्परांवर प्रभाव पडतो. गुण-वैशिष्ट्यांची देवाण-घेवाण सुरू असते. अशा रीतीने दोन किंवा अनेक संस्कृतींचा परस्परांवर प्रभाव पडून त्यांच्यात समन्वय अथवा संगतीकरण घडून येण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कृतीकरण होय.
संस्कृतीकरण म्हणजे नवीन प्रथा अथवा सवयींचा स्वीकार करणे नव्हे किंवा अनुकूलन नव्हे, तर नव्या प्रथांच्या मुळाशी असणार्या विचारांची व मूल्यांची अभिव्यक्ती होय. ही अभिव्यक्ती मुख्यत्वे वाङ्मयाच्याद्वारे होते. उदाहरणार्थ, धर्म, कर्म, पुण्य, माया, मोक्ष सांस्कृतिक विचार आहेत. वाङ्मय कथा, पुराणे इत्यादी साधनांद्वारे हे विचार सामान्य जनतेपर्यंत पोहोचतात. ते हळूहळू रूजू लागतात.
संस्कृतीकरण याचा साधा अर्थ म्हणजे सुसंस्कृत समाजाचे विचार व मूल्ये यांचा स्वीकार करणे. ही प्रक्रिया समाजाच्या वरच्या थराकडून खालच्या थराकडे जाण्याच्या दिशेने होते. समाजातील निम्नस्तर उच्च स्तरांचे अनुकरण करू लागतात. या प्रक्रियेला ब्राह्मणीकरण असे म्हणता येईल. पण ब्राह्मणीकरण हा एका अर्थाने संकुचित किंवा जातिविशिष्ट शब्द आहे. संस्कृतीकरणाचे आणखी एक उदाहरण म्हणजे नागरी रीतीरिवाजाचे ग्रामीण विभागात अनुकरण होणे. हे अनुकरण केवळ इष्ट अथवा उपयुक्त असतेच असे नाही. अस्सलापेक्षा खोटा हा अधिक भयानक व उपद्रवी असतो याचाही अनुभव या संस्कृतीकरणात येतो.
संस्कृतीकरणाची प्रक्रिया
भारतात असंख्य ग्रामीण जाती आहेत व त्या प्रत्येकाची संस्कृती भिन्न भिन्न प्रकारची आहे. प्रत्येक समाजाच्या प्रथा, चालीरीती, श्रद्धा, सण, समारंभ, पोषाख वेगवेगळे असतात. उच्च जाती व निम्न जाती यांच्यात सांस्कृतिकदृष्ट्या अनेक भेद आढळतात. आजच्या उच्च जाती या पाश्चात्त्यांच्या सवयीचे, पोशाखांचे व रीतीरिवाजांचे अनुकरण करणार्या आहेत. या अनुकरणाला आधुनिकीकरण असे म्हणतात. समाजात रूढ झालेल्या परंपरा व रीतीरिवाज सोडून आधुनिक जीवनपद्धती, विचार, श्रद्धा यांचा स्वीकार करणे म्हणजे आधुनिकीकरण होय.
उच्च जातीत आधुनिकीकरण शीघ्र गतीने होते, तर निम्न जातीत त्याची गती मंद असते. तसेच शहरात आधुनिकीकरण लवकर होते, तर ग्रामीण भागात विलंबाने होते. अर्थात, एका अर्थाने संस्कृतीकरण म्हणजे आधुनिकीकरण होय. एखादी जात सामाजिक स्तरात उच्च पद अथवा दर्जा प्राप्त व्हावा म्हणून आधुनिकीकरणाच्या मागे लागते. म्हणजे संस्कृतीकरणाचा उद्देश उच्च पद प्राप्त करून घेण्याचा असतो. निष्कर्ष असा की उच्च जातीचे अनुकरण करण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कृतीकरण, पण उच्च जाती स्वतःचे आधुनिकीकरण करतात म्हणून आधुनिकीकरण हाही संस्कृतीकरणाचा अर्थ आहे.
भारतातील संस्कृतीकरणाची लाट
इंग्रजी राजवटीपासून भारतात संस्कृतीकरणाची लाट आली. त्या वेळची इंग्रजी शिकलेली पिढी ही इंग्रजी झगमगाटाने दीपलेली होती. शिवाय राज्यकर्त्यांचे अनुकरण करणे ही त्या लोकांची सवयच असते. म्हणून ते स्वाभाविकही होते. इंग्रजी राजवटीतील यांत्रिक दळणवळणाची साधने व त्यामुळे भिन्न भिन्न प्रांतांतील लोकांच्या येणारा संपर्क यामुळे ही लाट वाढत गेली. या लाटेचे प्रतिबिंब साहित्यातही उमटले. मात्र याच इंग्रजी राजवटीत बहुसंख्य जनता शिक्षणापासून दूर असल्यामुळे ती या संस्कृतीकरणापासून दूर होती. पण स्वातंत्र्य मिळताच ही लाट पुन्हा झपाट्याने सुरू झाली. महात्मा गांधीजींनी ती थोपविण्याचा प्रयत्न केला पण तो फारसा यशस्वी झाला नाही.
उच्च आर्थिक स्तर हा संस्कृतीकरणाला सर्वस्वी नसला तरी काही अंशी सहायक होतो. तसेच शिक्षण व राजकीय दर्जा किंवा उच्च श्रेणीची नोकरी व पगार हे घटक संस्कृतीकरणाला उपकारक ठरतात. सत्ताधिकार्यांचे अनुकरण सेवाधिकार्यांनी करणे ही एक प्रक्रिया. समाजातील उच्च जातीचे अनुकरण कनिष्ठ जातीने करणे हेही एक संस्कृतीकरणाचे अंग आहे आणि त्यात काही गैर नाही.
या दुसर्या प्रक्रियेप्रमाणे घडून येणारे संस्कृतीकरण हे एका दृष्टीने प्रगतीचे लक्षण असते. संस्कृतीकरण ही एकांगी प्रक्रिया नसते. दोन समूह एकत्र आले की त्यांच्यात परस्परांत आचार, विचार व मूल्ये यांची देवाण-घेवाण होते. पण त्यातही श्रेष्ठ समाजाचे अनुकरण कनिष्ठांनी करण्याची प्रवृत्ती प्रभावी असते. श्रेष्ठ समाजाचे आचार-विचार कनिष्ठ समाज स्वीकारतो. त्यामुळे उच्च व कनिष्ठ हे दोन्ही परस्पर निकट येतात.