मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ बरोबर नसेल तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचे जागतिक क्रिकेटमध्ये काय महत्त्व राहील, असा खोचक सवाल मंडळाचे खजिनदार अरुण धुमाळ यांनी केला आहे.
मंडळाची बुधवारी सर्वसाधारण सभा तसेच निवडणूक पार पडली. अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली याच्यासह विविध पदाधिकाऱ्यांनी आपापल्या पदाची सूत्रे हाती घेतली. याला एक दिवस देखील होत नाही तोच खजिनदार धुमाळ यांनी परिषदेवर मार्मिक टीका केली आहे. परिषदेला मिळणारा महसूल पाहिला तर त्यातील जवळपास 80 टक्के वाटा भारतीय मंडळाकडून येतो, अशा वेळी जर या दोन संघटनांतील वाद विकोपाला गेले आणि भारतीय मंडळाने परिषदेतून बाहेर पडण्याचे ठरविले तर मग परिषदेच्या अस्तित्वाला काही अर्थ राहील का. महत्त्वाच्या निर्णयावेळी परिषदेत बोलण्याचा हक्क डावलला गेला तर भारताशिवाय परिषदेचे भवितव्य काय होईल हे वेगळे सांगायला नको, असेही ते म्हणाले.
2023 ते 2031 कालावधीचा स्पर्धा कार्यक्रम जाहीर करताना परिषदेने भारतीय मंडळाशी चर्चा केली नाही तसेच आमच्या काय सूचना आहेत ते देखील विचारात घेतले नाही, असेही धुमाळ यांनी व्यक्त केले.
आयपीएल संघांची नवोदितांवर नजर
इंडियन प्रिमिअर लीगच्या (आयपीएल) पुढील हंगामासाठी येत्या 19 डिसेंबरला खेळाडूंचा लिलाव होणार आहे. या स्पर्धेत जास्तीत जास्त नवोदितांना आपल्या संघात घेण्यासाठी सर्व संघाचे प्रयत्न राहणार आहे. संघात सध्या सरस कामगिरी करत असलेल्या खेळाडुंना संघात घेण्यापूर्वी त्यांना चाचणी सामने खेळण्यासाठी विविध संघांनी बोलावले आहे.
या स्पर्धेच्या इतिहासात सगळ्यात यशस्वी असेल्या मुंबई इंडियन्सने देखील काही खेळाडूंना पाचारण केले आहे. 2020 च्या स्पर्धेत देखील विजेतेपद मिळविण्यासाठी मुंबई इंडियन्स संघाने अनेक खेळाडूंना निमंत्रित केले आहे, त्यात ओडिशाचा नवोदित फिरकी गोलंदाज पप्पू रॉय याला आपल्या संघात घेण्याची तयारी सुरू केली आहे. विजय हजारे करंडक स्पर्धेत चर्चा झालेला रॉयला या हंगामात संधी मिळण्याचे संकेत आहेत. त्याने या स्पर्धेत 8 सामन्यात 18.42 च्या सरासरीने 14 विकेट घेतल्या.