शरद पवार : इंद्रायणी नदीच्या शुद्धीकरणाची जबाबदारी घेतली खांद्यावर
आळंदी – इंद्रायणी शुद्धीकरणाची मागणी आली आहे. जो वर्ग समाजाच्या हितासाठी मागणी करतो त्याच्या मागे सरकार उभे नाही राहिले तर असे सरकार काय कामाचे? त्यामुळे याची पूर्तता ही नक्कीच होईल. हे आश्वासन नाही तर हे कर्तव्य आहे. ही पूर्तता करण्याची जबाबदारी माझी आहे, असे आश्वासन माजी केंद्रीय कृषिमंत्री तथा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी शनिवारी (दि. 8) आळंदी येथे दिले.
52 वर्षे अखंड सेवा करण्याची संधी मिळाली
समाजाने खूप काही दिले आहे. आजपर्यंत 14 वेळा निवडून दिले असून चारवेळा मुख्यमंत्री केले. त्यामुळे 52 वर्षे अखंड समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. ज्या समाजाने आजपर्यंत भरभरून प्रतिसाद दिला; त्या समाजासाठीच स्वत:ला वाहून घेणे हे माझे आद्य कर्तव्य आहे. त्यामुळे आपण ज्या विकासकामांची मागणी करत आहात अशी कामे प्राधान्याने मार्गी लावली जातील. विशेषत: आळंदीतील प्रश्न स्थानिक आमदार, जिल्हा परिषद अध्यक्ष व नगराध्यक्षांची विशेष बैठक घेऊन मार्गी लावू. आणि हे आश्वासन नाही तर आपले कर्तव्य असल्याचे पवार यांनी सांगितले.
स्वानंद सुखनिवासी सदगुरू विष्णुबुवा जोग महाराज पुण्यतिथी शताब्दी सोहळ्या निमित्त शनिवारी (दि. 8) आयोजित कार्यक्रमात भाविकांना मार्गदर्शन करताना पवार बोलत होते. कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार दिलीप मोहिते,वारकरी शिक्षण संस्थेचे मार्गदर्शक हभप मारुती महाराज कुऱ्हेकरकर, संस्थेचे विश्वस्त हभप रामरावजी ढोक महाराज, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, माजी आमदार विलास लांडे, नगराध्यक्षा वैजयंता उमरगेकर, डी. डी. भोसले पाटील, बबनराव कुऱ्हाडे, राहुल चिताळकर, राम गावडे, प्रकाश म्हस्के, आळंदी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी समीर भूमकर, वारकरी शिक्षण संस्थेचे सर्व हभप महाराज, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शरद पवार म्हणाले की, वारकऱ्यांकडून आलेल्या इंद्रायणी स्वच्छतेची ही मागणी मला व्यक्तीश: भावलेली आहे. हे वारकऱ्यांचे वैयक्तिक काम नाही. समाजाचे काम आहे. त्यामुळे ते होईल. मी आश्वासन देत नाही. ते माझे कर्तव्य आहे. मुंबईला गेल्यावर मी या संदर्भात उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री, पालकमंत्री या सगळ्यांना एकत्र बोलावून याबद्दल चर्चा करेन आणि हे काम करून घेण्याबाबत सूचना करेन, असे आश्वासन त्यांनी दिले.
शरद पवार म्हणाले की, या वारकरी परंपरेचा समन्वय ज्ञानेश्वर महाराजांनी साधला. तेराव्या शतकापासून वारकरी परंपरा उदयाला आली. तेव्हापासून आजवरच्या काळात देशाने अनेक हल्ले पाहिले. पण त्यात वारकरी परंपरेला कोणतीच शक्ती हलवू शकली नाही. त्याचे कारण परंपरेत असलेली बांधिलकी. याचा उल्लेख बहिणाबाईंनी केला आहे. पाया संत ज्ञानेश्वरांनी घातला आणि कळस संत तुकारामांनी घातला. या संतविचारधारेद्वारे सर्व समाजाची उंची कशी वाढेल याचे स्वरूप वारकरी शिक्षण संस्थेने दिले.
मोदींच्या निर्णयाचे केले कौतुक
एकदा काशीतल्या घाटावर अर्धवट जळालेली प्रेतं पाहिले. देशातील कानाकोपऱ्यांतून जनता तिथे श्रद्धेपोटी येते. पंतप्रधानांनी तो घाट स्वच्छ करण्याचा निर्णय घेतला. वैचारिक मतभेद असले तरी त्यांनी घेतलेला निर्णय चांगला आहे. हे तिथे घडले असेल तर इथे घडून आणण्याची काळजी आपण घेतली पाहिजे.