नितीशकुमारांच्या संयुक्त जनता दलातून हकालपट्टी केल्यानंतर प्रशांत किशोर केवळ भाजपविरोधी वातावरणनिर्मितीसाठी प्रयत्नशील नसून ते विरोधी पक्षांनी रणनीती बनवण्याचे प्रशिक्षणही देत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र यात कॉंग्रेसच मोठा अडसर ठरत आहे. आगामी लोकसभेत भाजपशी थेट मुकाबला असणाऱ्याच जागा कॉंग्रेसने लढवाव्यात आणि यातील 200 जागांची निवड करावी, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे. परंतु कॉंग्र्रेसला या रणनीतीत सहभागी होण्याची इच्छा नाही.
दिल्लीच्या निवडणुकीवर आता सर्वांचेच लक्ष लागले आहे. दिल्लीच्या निकालांमुळे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे राजकीय भवितव्य ठरणार आहेच; पण प्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांची राजकीय प्रतिष्ठा देखील या निवडणुकीत पणाला लागली आहे. या दिग्गज हस्तींशिवाय आणखी एका नेत्याची वाटचाल या निकालावर अवलंबून असेल आणि तो म्हणजे प्रशांत किशोर. आतापर्यंत नीतिशकुमार यांच्या संयुक्त जनता दलात (जदयू) सक्रिय राहिलेले प्रशांत किशोर हे नुसते नेते नाहीत, राजकीय पक्षांसाठी पडद्यामागील सूत्रधार किंवा राजकीय रणनीतीकार म्हणूनही त्यांची देशभरात ओळख आहे. ममता बॅनर्जी, कॅप्टन अमरिंदर सिंग, उद्धव ठाकरे, हेमंत सोरेन,जगनमोहन रेड्डी यांसह अरविंद केजरीवाल यांच्यासारखे मुख्यमंत्री देखील प्रशांत किशोर यांच्या रणनीतीकौशल्याच्या प्रेमात पडले आहेत. प्रशांत किशोर यांनी अनेक नेत्यांना डावपेच शिकवले आणि त्यांचे पुनर्वसन करण्याचा प्रयत्न केला आहे.
प्रशांत किशोर यांची राजकीय वाटचाल ही एखाद्या परीकथेपेक्षा कमी नाही. ते बिहारच्या रोहतास जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते स्वकर्तृत्वावर संयुक्त राष्ट्रसंघापर्यंत पोचले होते. त्यांचा राजकारणातील प्रवेश नरेंद्र मोदी यांच्यामुळे झाला. 2012 मध्ये जेव्हा मोदी सलग तिसऱ्यांदा गुजरातमध्ये सत्ता स्थापन करत होते, तेव्हा प्रशांत किशोर त्यांच्या संपर्कात आले. किशोर यांनी “सिटिझन्स फॉर अकाऊंटेबल गव्हर्नन्स’ म्हणजेच सीएजी नावाने एक संस्था स्थापन केली. त्यानंतर 2014 मध्ये लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी प्रचंड बहमुताने निवडून आले. ते पंतप्रधान झाले. इथपासूनच किशोर यांची खडतर वाटचाल होऊ लागली. मोदींच्या यशाचे श्रेय आपल्यालाही द्यायला हवे, अशी त्यांची अपेक्षा होती. ते केंद्रातील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या सरकारमध्ये भूमिका स्वीकारण्यास तयार होते, परंतु त्यांची अपेक्षा पूर्ण होऊ शकली नाही. नरेंद्र मोदी आणि अमित शहांकडून काही दिवसातच त्यांचा अपेक्षाभंग झाला.
मोदींनंतर त्यांची नीतिशकुमार यांच्याशी जवळीक वाढली. एक वेळ अशी आली होती की, नीतिशकुमार यांनी पक्षातील बड्या नेत्यांना बाजूला हटवून प्रशांत किशोर यांना राजकीय वारसदार म्हणून निवडण्यासाठीची पार्श्वभूमी तयार केली होती. याच प्रशांत किशोर यांनी जेडीयूला कॉंग्रेस आणि राजदशी हातमिळवणी करायला लावली. या आधारावर त्यांना भाजपचा पराभव करता आला. त्यानंतर ते पंजाबचे कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याशी जोडले गेले. तेथे त्यांनी अकाली दल आणि भाजप आघाडीला हरविण्यासाठी रणनिती आखली. विशेष म्हणजे तेथेही भाजपचा पराभव झाला. यानुसार महाराष्ट्रात शिवसेना भाजपशी युती असताना शिवसेनेने सत्तास्थापन करताना त्यांची साथ सोडली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले. झारखंडमध्येही हेमंत सोरेनसोबत प्रशांत किशोर होते. आंध्र प्रदेशमध्ये जगनमोहन रेड्डी यांनी तर सार्वजनिकरित्या प्रशांत किशोर यांच्या योगदानाचा उल्लेख केला. आता त्यानंतर प्रशांत किशोर आम आदमी पक्षासोबत काम करत आहे.
प्रशांत किशोर हे संपूर्ण भारतात भाजपविरोधात वातावरण तयार करण्याच्या कामाला लागले आहेत. त्यामुळे ते भाजपविरोधी पक्षांना रणनितीचे धडे देत आहेत. त्यांची मदत घेणाऱ्यांत आता द्रमुकचा समावेश झाला आहे. प्रशांत किशोर यांच्या मदतीने आगामी विधानसभा निवडणुकीत द्रमुक पावले टाकणार आहेत. प्रशांत किशोर हे सुधारित नागरिकत्व कायदा आणि एनआरसीविरोधात सक्रियपणे काम करत आहेत. या कायद्याच्या विरोधकांना एकत्र करुन ईस्टर्न साऊथ राजकीय कॉरीडॉर तयार करण्याची रणनिती आखत आहेत. भाजपला सत्तेपासून दूर ठेवणे हा यामागचा उद्देश आहे. मात्र यात कॉंग्रेसच मोठा अडसर ठरत आहे. आगामी लोकसभेत भाजपशी थेट मुकाबला असणाऱ्याच जागा कॉंग्रेसने लढवाव्यात आणि यातील 200 जागांची निवड करावी, असे प्रशांत किशोर यांचे म्हणणे आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, उत्तराखंड, हिमाचल, महाराष्ट्र, केरळ आणि कर्नाटकातील काही भागात कॉंग्रेस आणि भाजप यांच्यात थेट लढत होऊ शकते. परंतु कॉंग्र्रेसला या रणनीतीत सहभागी होण्याची इच्छा नाही. त्यांनी किशोर यांचे मत फेटाळून लावले आहे. याचा अर्थ प्रशांत किशोर आणि कॉंग्रेस यांचे संबंध बिघडले, असा होत नाही. कॅप्टन अमरिंदर सिंग हे त्यांचे मोठे समर्थक आहेत. राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याशी त्यांचा सतत संपर्क आणि भेटीगाठी असतात. मात्र राहुल यांचा मोठा प्रश्न म्हणजे ते कॉंग्रेसची मानसिकता बदलू शकले नाहीत.
सामान्यांपर्यंत आपले म्हणणे पोहोचत नसल्याचे कॉंग्रेसच्या नेत्यांचे म्हणणे आहे. कॉंग्रेसचा मीडिया हाऊस हा अजूनही 2014 प्रमाणेच आहे. त्यात कोणताही बदल झालेला नाही. त्यामुळे कॉंग्रेस सर्वच स्तरावर पोचण्यास अपयशी ठरत आहे. देशात युवकांच्या नोकऱ्या जात आहेत आणि त्यामुळे लोक मोदी सरकारवर नाराज आहेत. मात्र आपला पक्ष नव्याने कोणताही सदस्य नोंदणी अभियान सुरू करण्यास इच्छुक नाही, असे कॉंग्रेस नेत्यांचे म्हणणे आहे. हिंदु आणि मुस्लिम यांच्यातील वाढत्या दरीमुळे कॉंग्रेसचे नुकसान झाल्याचे नेते म्हणतात.
दुसरीकडे जातीयवाद किंवा धार्मिकवादाला रोखण्यास कॉंग्रेसने एखादी सामाजक अभियान देखील सुरू केले नाही, हे देखील तितकेच खरे. गेल्या काही दिवसांपासून सीएए आणि एनआरसीवरून देशातील वातावरण तापले असून प्रशांत किशोर या वातावरणाच्या मदतीने भाजपविरोधी आघाडी तयार करु इच्छत होते. परंतु अनेक पक्षांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही. तसेच ते मुस्लिम समाजातील प्रतिनिधींना भेटून ते एक संयुक्त कृती समिती तयार करण्याची मनीषा बाळगून होते. मात्र त्यासही बहुतांश मुस्लिम नेत्यांनी नकार दिला.
आता प्रशांत किशोर यांची मदार दिल्ली निवडणुकीच्या निकालावर आहे. दिल्लीचे निकाल हे देशातील राजकीय भूकंप ठरु शकतो, असे प्रशांत किशोर म्हणतात. त्यानंतर बिहार विधानसभेला नितीशकुमार अडचणीत येत असतील तर प्रशांत किशोरसाठी ही संधी असेल. प्रशांत किशोर यांना कॉंग्रेस आणि लालू प्रसाद यादव यांचा पाठिंबा मिळू शकतो, मात्र ते लालूप्रसाद यादव आणि त्यांच्या कुटुंबीयांवरुन फारसे आशावादी नाहीत. त्यामुळे नीतीशकुमारना टक्कर देणारा तोडीचा दुसरा चेहरा हवा आहे.
दहा वर्षाच्या काळात देशातील अनेक मुख्यमंत्र्यांशी जोडले जाणे हे प्रशांत किशोर यांचे मोठे यश मानले जाते. अरविंद केजरीवाल हे भाषणच नाही तर ट्विट देखील त्यांना विचारल्याशिवाय करत नाहीत. ममता बॅनर्जी यांनी देखील प्रशांत किशोर यांचे सहकार्य घेण्याचे ठरविले आहे. 2021 मध्ये तुमचा विजय निश्चित आहे, असे प्रशांत यांनी ममतांना सांगितले आहे. जर दिल्लीत आप पक्षाची घरवापसी झाली तर त्याचे श्रेय प्रशांत किशोरना जाईल. अशा स्थितीत किशोर हे बिहारमध्ये नवा पक्ष स्थापन करतील का? ते नीतीशकुमार यांना आव्हान देतील का? असे काही प्रश्न आहेत. याचे सध्या काही उत्तरे नाहीत. मात्र 11 फेब्रुवारी रोजी निकालाच्या दिवशी निश्चितच यासंबंधीचे संकेत मिळू शकतील. याच दिवशी प्रशांत किशोर पाटण्यात “मन की बात’ करतील, अशी आशा आहे.
रशिद किडवाई
ज्येष्ठ राजकिय विश्लेषक