मुंबई – मशिदींवरील भोंग्यांच्या मुद्दावर राज ठाकरे यांनी आक्रमक पावित्रा घेत 4 मेपासून आपला कार्यक्रम हाती घेतला जाणार असल्याचा इशारा दिला. तसेच हिंदूंनी जिथे बांग सुरू असेल तिथं हनुमान चालिसा लावावी, अस आवाहन राज ठाकरेंकडून करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांच्यावर गुन्हे दाखल झाले असून त्यांच्या अटकेच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. अटकेच्या चर्चेनंतर मनसेकडून सरकारला इशारा देण्यात आला आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे म्हणाले की, औरंगाबादमधील सभेला ज्या अटी आणि शर्थी घातल्या होत्या, तेव्हाच कळालं होतं की हे गुन्हा दाखल करण्यासाठी आहे. पण राज ठाकरे आजही आपल्या भूमिकेवर ठाम असून मनसैनिक साहेबांच्या आदेशांचं पालन करेल.
दरम्यान आम्हाला अन्यायकारकरित्या अडकविण्याचा प्रयत्न केला जात असेल तर सरकारनं तयार राहावं. राज ठाकरेंना अटक झाली तर महाराष्ट्र सैनिक रस्त्यावर उतरेल. मग आमच्यावर कितीही केसेस पडू द्यात आम्ही घाबरत नाही असंही संदीप देशपांडे म्हणाले.
कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्दावरून राज ठाकरे यांच्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातच त्यांच्या अटकेच्या चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र आथा मनसेने राज ठाकरेंना अटक झाल्यास खळखट्ट्याक करण्याचा इशारा दिला आहे.