पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – “या लोकसभेच्या निवडणुका आहेत. आरोप-प्रत्यारोप होत असतातच. तसेच निवडणुका या तेवढ्यापुरत्या असतात. मात्र, निवडणूका संपल्यावर संबंध सुधारू शकतात,’ असे सूचक वक्तव्य राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या बारामती लोकसभेच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी पुण्यात माध्यमांशी बोलताना केले आहे.
मात्र, त्याच वेळी मूळ पवार आणि बाहेरचे पवार यावर बोलण्यास मात्र त्यांनी स्पष्ट नकार दिला आहे. सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी भाजपचे माजी खासदार प्रदीप रावत यांची भेट घेतली. त्यानंतर बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या, “मी राजकरणात सक्रीय नसले, तरी गेली २५ वर्षे मी समाजकारणात सक्रीय आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात माझे काम आहे.
मतदारांची भाषा मला नक्की समजते, त्यामुळे मतदारांचे प्रश्न मी संसदेत नक्कीच मांडू शकते. राजकरणात भावनिक आरोप होणे हे दुर्दैवी असले, तरी मी एकटी नाही. बारामती माझं कुटूंब आहे. राजकरणात कोणीही कोणाला भेटू शकते. मी पण भेटते असे सांगत,’ असे बोलत शरद पवार यांच्या भेटीगाठींच्या राजकरणाचा काहीच फरक पडणार नसल्याचे अप्रत्यपक्षपणे सांगण्याचा प्रयत्न केला.