पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – लोकसभा निवडणुकीच्या कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या ठिकाणी अद्यापही सुमारे सात हजार कर्मचारी हजर झालेले नाहीत. या सर्व कर्मचार्यांना कारवाई करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे. या सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांना जिल्हा प्रशासन नोटीस बजावणार आहे.
जिल्ह्यात लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. पुणे, बारामती, मावळ आणि शिरुर या चार लोकसभा मतदारसंघांचा जिल्ह्यात समावेश होतो. जिल्ह्यात सुमारे 83 लाख इतके मतदार आहेत, तर जिल्ह्यात एकूण 8 हजार 300 इतके मतदान केंद्र आहे.
या निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासनाने 71 हजार कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश जिल्हा प्रशासनाने काढले आहे. या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणासाठी नेमून दिलेल्या विधानसभा मतदारसंघात उपस्थित राहण्यास सांगितले होते. मात्र यातील सुमारे सात हजार कर्मचाऱ्यांनी प्रशिक्षणाला दांडी मारली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
पाणी पुरवठा, घनकचरा, एनसीएल यासारख्या काही केंद्रीय संस्था, बँक, डॉक्टर यासारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची देखील निवडणुकीच्या कामकाजासाठी नेमणूक करण्यात आली आहे. त्यांचा आढावा घेऊन अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामकाजातून त्यांना वगळण्यात येईल, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी दिली.
कारण जाणून घेणार
निवडणुकीच्या कामकाजासाठी हे कर्मचारी का हजर झालेले नाहीत, याबाबत त्यांच्याकडून खुलासा मागवला जाणार आहे. त्यानंतर सक्षम कारण असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना कामकाजातून वगळण्यात येईल. तसेच सक्षम कारण नसेल आणि कामकाज करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे निदर्शनास आल्यास अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उभारण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ.सुहास दिवसे यांनी दिली.