नागपूर – राज्याचे नवे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर आज प्रथमच नागपुरात आले त्यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. विमानतळावरून त्यांच्या निवासस्थानपर्यंत त्यांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. त्यात मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
यावेळी उपस्थितांसमोर बोलताना ते म्हणाले की, अडीच वर्षांपूर्वी राज्यातील जनतेने भाजप-शिवसेनेच्या बाजूने कौल दिला होंता. पण आपल्या पाठीत खंजीर खुपसला गेला आणि आपला कौल हिरावून घेतला गेला. पण आपण शिवाजी महाराजांचे वारसदार आहोत. त्यांच्याच गनिमीकाव्याच्या तंत्राने आपण या राज्यात पुन्हा आपले सरकार सत्तेवर आणले आहे असे ते म्हणाले.
आपण उपमुख्यमंत्रिपदाची का स्वीकारली यावर भाष्य करताना ते म्हणाले की, आपण नवीन सरकारचा भाग असणार नाही असे आपण जाहीर केले होते. पण घरी गेल्यानंतर पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नढ्ढा यांचा फोन आला. त्यांनी मला तो निरोप दिला. त्यानंतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशीही बोलणं झालं. त्यांनी मला सरकारमध्ये सहभाग होण्याची व उपमुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची सूचना केली. पक्षात आदेश हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे मी तो आदेश पाळला आणि ही नवीन जबाबदारी स्वीकारली.
भाजप आणि मोदी नसते तर हा नागपुरातला देवेंद्र कधीच मुख्यमंत्री झाला नसता. त्यामुळे जे नेते आणि जो पक्ष मला सर्वोच्च पदावर बसवतात, त्यांनी आदेश दिला तर मी घरी बसायलाही तयार आहे असे फडणवीस यांनी यावेळी नमूद केले. त्यांनी माझा सन्मान करून मला सरकारमध्ये जाण्यास सांगितलं म्हणून मी उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार झालो, असे त्यांनी यावेळी सांगितले.