पोलिसांवर हल्ल्यांच्या १९० घटना; ६८६ व्यक्तींना अटक – गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आतापर्यंत कोविड संदर्भातील ९८ हजार गुन्ह्यांची नोंद झाली. तसेच पोलिसांवर हल्ला होण्याच्या १९० घटना घडल्या. त्यात ६८६ व्यक्तींना ताब्यात घेतले असल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
राज्यात लॉकडाऊनच्या म्हणजे दि.२२ मार्च ते ७ मे या कालावधीत कलम १८८ नुसार ९८,७७४ गुन्हे नोंद झाले असून १९,०८२ व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. विविध गुन्ह्यांसाठी ३ कोटी ६६ लाख ३१ हजार ७९४ रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
१०० नंबर..
पोलीस विभागाचा १०० नंबर हा सर्व जिल्ह्यात २४ तास कार्यरत असतो. लॉकडाऊनच्या काळात या १०० नंबर वर प्रचंड भडिमार झाला. ८६,२४६ फोन आले, त्या सर्वांची योग्य ती दखल घेण्यात आली. तसेच राज्यभरात पोलिसांनी ज्यांच्या हातावर क्वारंटाइन असा शिक्का आहे अशा ६५३ व्यक्तींना शोधून त्यांना विलगीकरण कक्षात पाठविले. राज्यात एकूण २,२६,२३६ व्यक्ती क्वारंटाइन आहेत. अशी माहिती श्री. देशमुख यांनी दिली. तसेच अत्यावश्यक सेवेसाठी आतापर्यंत पोलीस विभागामार्फत ३,१५,४३४ पास देण्यात आले आहेत.
या काळात अवैध वाहतूक करणाऱ्या १२८६ वाहनांवर गुन्हे दाखल करण्यात आले व ५४,१४८ वाहने जप्त करण्यात आली. तसेच परदेशी नागरिकांकडून झालेले व्हिसा उल्लंघनचे १५ गुन्हे राज्यभरात नोंदवले आहेत.