नवी दिल्ली: देशभरातील स्थलांतरित मजुरांसाठी सुरू करण्यात आलेल्या श्रमिक ट्रेनची मोहीम आता अंतिम टप्प्यात आली असून लवकरच ही सेवा बंद केली जाणार आहे. रेल्वेने आतापर्यंत 4197 श्रमिक ट्रेन विविध राज्यांमध्ये चालवल्या.
तथापि, 1 मे पासून आतापर्यंत 256 रेल्वे गाड्या विविध कारणांनी रद्द कराव्या लागल्या आहेत. यातील सर्वाधिक गाड्या महाराष्ट्रातील आहेत. महाराष्ट्रातून सोडल्या जाणाऱ्या एकूण 105 गाड्या रद्द कराव्या लागल्या असून गुजरातमधून सोडल्या जाणाऱ्या 47 गाड्या तर कर्नाटकातून सोडण्यात येणाऱ्या 38 गाड्या रद्द कराव्या लागल्या आहेत.
उत्तर प्रदेशातून सोडल्या जाणाऱ्या 30 गाड्यांही आतापर्यंत रद्द करण्यात आल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे. उर्वरित काळात आता केवळ 10 श्रमिक ट्रेन सोडल्या जाणार आहेत, असेही रेल्वेने स्पष्ट केले आहे.