पुणे(प्रतिनिधी) – लॉकडाऊनमुळे पुण्यात अडकलेल्या 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना आतापर्यंत त्यांच्या राज्यात पाठविण्यात आले आहे. यामध्ये मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, तामिळनाडू, राजस्थान व बिहार हिमाचल, झारखंड, छत्तीसगड, जम्मू आणि काश्मिर, मणीपूर व आसाम राज्यामधील प्रवाशांचा समावेश आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी दिली आहे.
पुणे विभागातून मध्यप्रदेशसाठी 15, उत्तरप्रदेशसाठी 51, उत्तराखंडसाठी 1, तामिळनाडूसाठी 2, राजस्थानसाठी 5, बिहारसाठी 21, हिमाचल प्रदेशसाठी 1, झारखंडसाठी4 , छत्तीसगडसाठी 4 , जम्मू आणि काश्मिर साठी 1, मणिपूरासाठी 1, आसामसाठी 1 अशा एकूण 107 रेल्वेगाडया 1 लाख 42 हजार 781 प्रवाशांना घेवून रवाना झाल्या आहेत. या नागरीकांच्या प्रवासाच्या नियोजनाकरीता सबंधित जिल्हा प्रशासन, पोलीस यंत्रणा, संबंधित तहसील कार्यालय आणि रेल्वे विभागाच्या अधिकारी-कर्मचारी यांनी यामध्ये मोलाची भूमिका बजावत असल्याचेही विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी सांगितले.