पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेनंतर राज्यात जातीवाद वाढला, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला होता. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून राज ठाकरे यांना प्रबोधनकार ठाकरेंचा साहित्य वाचण्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवारांनी दिला होता. त्याला आज राज ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलं. मात्र यावेळी राज ठाकरे यांनी भाजप संदर्भातील प्रश्नाचं उत्तर देण्याचं टाळलं.
पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते. आजची त्यांची पत्रकार परिषद जेम्स लेन, बाबासाहेब पुरंदरे, राष्ट्रवादी काँग्रेस आणि जातीवाद या मुद्दांनीच गाजली. अजूनही आपण जातीपातीमध्ये खितपत पडलो आहोत. स्वातंत्र्याच्या 74 वर्षानंतरही निवडणुकीत भाषणं होतात तेव्हा सगळ्यांकडून सारखं रस्ते, पाणी, विज अशी तिच तिच आश्वासनं दिली जात आहेत. तेव्हा एवढ्या वर्षात आपण काय केलं हे शोधलं पाहिजे, असं ते म्हणाले.
साधारणपणे आपण 1999 साल पाहिलं तर त्यापूर्वी महाराष्ट्रात जातीपाती होत्याच. पण 99 नंतर जातीपातींमध्ये द्वेष वाढला, हे माझं वाक्य होतं. राष्ट्रवादीच्या निर्माणानंतर तो वाढला असं मी म्हणालो होतो, असं राज ठाकरे म्हणाले.
दरम्यान राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं मग भाजपमुळं देशात धर्माचं राजकारण वाढलं नाही, का ? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देणं राज ठाकरेंनी टाळलं. ते म्हणाले, हिंदुत्वाचं राजकारण होतं. वातावरण असतं आणि वातावरण तयार केलं जातं या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. मात्र त्यांनी या प्रश्नावर स्पष्ट उत्तर देणं टाळल्याचं दिसून आलं.