Chhagan Bhujbal : गेल्या काही दिवसांपासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाबाबत आक्रमक भूमिका मांडत आहेत. जरांगेच्या भूमिकेला मंत्री छगन भुजबळ हे कडाडून विरोध करत आहेत. छगन भुजबळ यांची नगरमध्ये ओबीसी एल्गार सभा पार पडली होती. या सभेमध्ये आपण पहिली सभा ज्यावेळी घेतली त्यापूर्वीच म्हणजेच १६ नोव्हेंबरला राजीनामा दिला होता असा गौप्यस्फोट भुजबळांनी केला. त्यानंतर पुन्हा एकदा आपण राजीनामा नेमका का दिला याबाबत भुजबळांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
छगन भुजबळ यांनी ओबीसीमध्ये मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. तेव्हापासून अनेकांनी त्यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा अशी टीका करायला सुरुवात केली होती. मनोज जरांगे पाटील यांनी देखील भुजबळांवर आक्रमक शब्दात टीका सुरूच ठेवली आहे.आज भुजबळांनी पुन्हा एकदा आपण राजीनामा का दिला याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
‘१६ नोव्हेंबर रोजी राजीनामा दिल्याचे कुणालाही माहिती नव्हते. तर एकानेही माझ्या राजीनाम्याची मागणी केली नव्हती पण १७ डिसेंबरसला अंबडमधील ओबीसी एल्गार सभेतून आपली भूमिका मांडायची होती आणि याची कल्पना मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांना हवी म्हणून मी आपला राजीनामा दिला असं पुन्हा एकदा भुजबळांनी अधोरेखित केलं. ते पुढे म्हणाले,मी अंबडला जात असताना मला वाटेत सांगितले, की या राजीनाम्याची कुठे वाच्यता करू नका, शांत रहा.. परंतु सरकारी पक्षातील एखादा आमदार कंबरेत लाथ घालण्यापर्यंत बोलू लागला तर लोक मला काय म्हणतील..त्यामुळे मी माझ्या राजीनाम्याची वाच्यता केली असल्याचे भुजबळांनी यावेळी सांगितले.
काय म्हणाले होते भुजबळ सभेत नेमकं ?
१७ नोव्हेंबरला ओबीसी एल्गारची पहिली रॅली अंबडला झाली आणि १६ ओव्हेबरला मी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि मग अंबडच्या सभेला रवाना झालो.असा बॉम्बच भुजबळांनी या सभेतून टाकला .तसेच मी अडीच महिने शांत राहिलो. कोण म्हणाल राजीनामा द्या.. कोण काय म्हणाल पण मी ओबीसीसाठी शेवटपर्यंत लढणार आहे असं देखील भुजबळ यावेळी म्हणाले.