नवी दिल्ली – शनिवारी रात्री उशिरा उत्तराखंडमध्ये बर्फवृष्टी झाल्यानंतर सकाळी सूर्य उगवल्यावर डोंगररांगा चांदीसारख्या चमकल्या. उंचावरील भागात बर्फवृष्टी आता खालच्या भागातही पोहोचली आहे. गावातील चौकाचौकात, शेततळ्यात आणि सर्वच रस्ते बर्फाने आछादलेले दिसून आले होते. रात्रीच्या दंवामुळे बर्फ गोठल्याने असे झाले असावे. परिसरात आता कडाक्याची थंडी आहे. बर्फवृष्टीनंतर सूर्यप्रकाशामुळे काहीसा दिलासा मिळाला असल्याचे समजले. घुनी, पडेरगाव, जोशीमठ तसेच तपोवन परिसरातील गावांमध्ये बर्फवृष्टी झाली आहे. पोखरी ब्लॉकमधील मोहनखल, ब्राह्मण थळा, नेल, कलसीर गावात पावसासोबतच बर्फवृष्टी झाली.
हिमवृष्टीमुळे तापमानात कमालीची घट दिसून आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य दैनंदिन जनजीवन ठप्प झाले आहे. अशातच पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. देशभर अन्यत्र उन्हाच्या झळा सुरु झाल्या असल्या तरीही, येथे मात्र थंडीचा प्रकोप अद्यापही सुरुच आहे. ही थंडी आणखी तीन दिवस तरी कायम राहील, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे.
शनिवारी, बद्रीनाथ धाम, हेमकुंड साहिब, रुद्रनाथ, लाल माती, औली, गौरसन बुग्याल, व्हॅली ऑफ फ्लॉवर्ससह उच्च उंचीच्या भागात जोरदार बर्फवृष्टी झाली. त्यानंतर थंडीचा कडाका वाढला आहे. हिमवृष्टीमुळे सखल भागात थंडीची लाट वाढली आहे. जोशीमठ नगर परिसरात या हंगामातील पहिला बर्फवृष्टी झाली, मात्र बर्फ लवकर वितळला.
शनिवारी झालेल्या बर्फवृष्टीमुळे बद्रीनाथ महामार्ग आणि मलारी महामार्गावरील बर्फ हटवण्याच्या कामावर परिणाम झाला. दुपारी बर्फवृष्टी सुरू होताच, बीआरओ (बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन) ने ज्या ठिकाणी बर्फ काढला होता त्या ठिकाणी पुन्हा बर्फ जमा झाला. येथे औली रोडवर बर्फवृष्टी झाल्यानंतर निसरडेपणा वाढला आहे.
त्याचवेळी यमुना खोऱ्यात रात्री उशिरापर्यंत बर्फवृष्टी झाल्यानंतर सकाळी वातावरण स्वच्छ झाले. तेजस्वी सूर्यप्रकाशात, यमुनोत्री खोऱ्यासह, यमुना मंदिर आणि यमुना मातेचे माहेर असलेल्या खरशालीगाव येथील भूतेश्वर महादेव मंदिराचे अप्रतिम दृश्यही दिसत होते.