राजगुरूनगरमध्ये “या’ चिमुकल्यांची होतेय कचऱ्याच्या ढिगावरच होते गुजराण
राजगुरूनगर- जगाला करोना संसर्गाच्या भीतीने ग्रासले आहे. मरणाच्या भीतीने अनेकजण सुरक्षित राहण्याची काळजी घेत आहेत किंवा तशी धडपड करीत आहेत. सर्वसामान्य लोकांनी लॉकडाऊनमध्ये बंद दरवाजाआड स्वत:ला कोंडून घेतले आहे. अशाही स्थितीत पोटासाठी कचऱ्याच्या ढिगात काहीतरी सापडेल या आशेने “ती’ मुले दुर्गंधीच्या राशीवर बसून जगण्याचा सुगंध शोधीत असल्याचे चित्र राजगुरूनगर पोलीस ठाण्याच्या मागच्या बाजूला असलेल्या कचरा डेपोत पाहायला मिळत आहे.
जगाला कोरोना आजाराने ग्रासल्याच्या पार्श्वभूमीवर राजगुरुनगर शहरात गेले अनेक दिवस एक भयानक प्रकार पाहायला मिळत आहे. काहीतरी मिळेल या आशेने पछाडलेली सुमारे 5 ते 12 वर्ष वयोगटांतील मुले दिवसभर कचऱ्याच्या ढिगावर बसून असतात. नाका-तोंडासाठी कोणतीही सुरक्षा नाही, पायात चप्पल नाही अशा अवस्थेत ही चिमणी पाखरं कचरा घेऊन येणाऱ्या गाडीची चातकाप्रमाणे वाट पाहतात. काही सापडेल या हेतूने अपघाताचा धोका पत्करून त्या वाहनाच्या जवळ जाऊन घोळका करतात. कचरा खाली झाला की तो थेट हाताने चाळून बघतात. त्यातही त्यांची चढाओढ असतेच. लॉकडाऊनच्या धाकाने सर्वांवर सुरक्षित राहण्याची सक्ती करणाऱ्या सर्वच शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांचे त्यांच्याकडे दुर्दैवाने दुर्लक्ष आहे.
राजगुरूनगर शहराजवळच्या चांडोली गावात कातकरी वस्ती आहे. तेथील मुलांची ही अवस्था आहे. लॉकडाऊनच्या काळात सरकारकडून या लोकांची मुलाबाळांसहित जेवणाची व्यवस्था केली आहे. मात्र, तरीही हक्काचे व कष्टाचे मिळवण्याकरीता ही मुले कचरा घेऊन येणाऱ्या गाड्यांची वाट पाहत असतात. आज कोणी देईल, उद्याचे काय, हा प्रश्न सोडवायला या परिवारातील मुले कचऱ्याच्या ढिगावर आपले भविष्य शोधताना नेहमीच आढळून येतात.
- उद्याच्या मरणापेक्षा आजच्या जगण्याची काळजी
इयत्ता दहावीच्या जुन्या अभ्यासक्रमात स्मशानातील सोन ही लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांची लिखित कथा अनेकांनी वाचली. जगण्यातले भयाण वास्तव या कथेत आहे.येथे स्मशानात नाही; परंतु कचऱ्यात ही मुले सोनं (त्यांच्यासाठी मिळेल ती चीजवस्तू) शोधण्याची प्रयत्न अशा मुलांकडून होत आहे. देशोदेशीच्या श्रीमंतांची मोजदाद, त्यांचे खालीवर होणारे मानांकन याची चर्चा नेहमी होते. मात्र जगात असेही अनेक लोक आहेत की ज्यांना उद्या येणाऱ्या मरणापेक्षा आजच्या जेवणाचीच काळजी अधिक असल्याचे या प्रकारातून प्रकर्षाने जाणवते. - खाद्यपदार्थांपासून खेळण्यांपर्यंतचा शोध
राजगुरूनगर शहरातून गोळा होणारा रोजचा कचरा पुणे-नाशिक महामार्गालगतच्या पोलीस ठाण्यामागील जागेत जमा होतो. तिथे वर्गीकरण करून विल्हेवाट लावण्यासाठी दुसरीकडे नेला जातो. हे सर्व होत असताना येथे कचऱ्याचा डोंगर उभा राहतो. या परिसरात दुर्गंधी पसरलेली असते. कर्मचारी तोंडाला सुरक्षित मास्क, रुमाल बांधून असतात, तर येथून ये-जा करणारे नाक हातात धरूनच पुढे जातात. असे असताना चांडोली येथील कातकरी वस्तीतील लहान मुले या कचऱ्यातून काही मिळते का, याचा शोध नेहमीच घेत असतात. खाद्यपदार्थ, मौल्यवान वस्तू, प्लॅस्टिक, फेकून दिलेली खेळणी अशा वस्तूंचा शोध त्यांची नजर घेत असते.