क्रिकेटवेड्या आपल्या देशात अन्य खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोनही कोत्या मनोवृत्तीचा आहे. फुटबॉलबाबत बोलायचे तर आधी बायचुंग भुतियाने तर आता सुनील छेत्रीने आपल्या गुणवत्तेचा झेंडा अटकेपार फडकावला. त्यांनी जागतिक स्टार समजले जात असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डो व लिओनेस मेस्सी यांच्या कामगिरीलाही मागे टाकले तरीही त्यांच्या वाट्याला कौतुकाचे बोल काही आले नाहीत. क्रिकेटलाच धर्म मानणाऱ्या देशात भुतिया व छेत्री हे दोन खेळाडू जन्माला आले हेच त्यांचे दुर्दैव दुसरे काय.
आता काही दिवसांपूर्वी टोकियो ऑलिम्पिक तसेच पॅरालिम्पिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पदके जिंकल्यावर त्यांचे अफाट कौतुक झाले. मात्र, हा ताप काही दिवसांत उतरेल व टी-20 विश्वकरंडक सुरू झाल्यावर अन्य खेळांकडे डोळेझाक केली जाईल. सध्या सुरू असलेल्या सॅफ फुटबॉल स्पर्धेत छेत्रीने ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या कामगिरीची आधी बरोबरी केली तर याच आठवड्यात त्यांच्या कामगिरीलाही मागे टाकले. तरीही त्याला फारशी प्रसिद्धी मिळाली नाही. हीच कामगिरी जर एखाद्या परदेशी खेळाडूने केली असती तर भारतातीलच माध्यमांनी त्याला डोक्यावर घेतले असते. कारण कायमच आपल्याला परकियांचे कौतुक राहिले आहे, हे काही वेगळे सांगायला नको.
सॅफ स्पर्धेत छेत्रीने पेले यांच्या 77 गोलच्या कामगिरीला मागे टाकले तेव्हाही इंग्रजी माध्यमांनी त्याच्याकडे फारसे लक्ष दिले नाही व आयपीएलस्पर्धेचीच तळी उचलण्याचे धोरण राबवले. भारताकडून 123 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा छेत्री दुर्लक्षित राहिला आहे. नेपाळविरुद्धच्या सामन्यात छेत्रीने केलेला गोल पेलेंची बरोबरी करणारा ठरला. हा गोल करताना त्याच्यापुढे आणखी दोन महान खेळाडूंच्या कामगिरीलाही मागे टाकण्याची संधी निर्माण झाली आहे. रोनाल्डो व मेस्सी यांनी जागतिक फुटबॉलवर वर्चस्व राखल्याचा टेंभा मिरवणारी माध्यमे छेत्रीच्या कामगिरीला कमी का लेखतात, हे एक कोडे आहे.
आज जर छेत्री युरोप, अमेरिका, पोर्तुगाल, अर्जेन्टिना या देशात जन्माला आला असता तर त्याला पाहण्यासाठी लाखो चाहते स्टेडियमवर जमले असते. इतकेच नव्हे तर लाखो चाहते रस्त्यावरही त्याच्या कौतुकासाठी जमले असते यात शंका नाही. पण तुम्ही कधी, कुठे जन्मता यावरही बरेच काही अवलंबून असते. क्रिकेट खेळत असलेल्या केवळ 10-12 देशांची विश्वकरंडक स्पर्धा होते, हा तर क्रिकेटमधील सर्वात मोठा विनोद असेल. फुटबॉल विश्वकरंडकात किंवा युरोप-अमेरिकेत होत असलेल्या फुटबॉल स्पर्धा पाहिल्या की आपले क्रिकेटविश्व फुटबॉलच्या तुलनेत किती खुजे आहे याची साक्ष पटते. म्हणूनच देशात क्रीडासंस्कृती रुजली पाहिजे अशा बाता मारणारे पाहिले की असे वाटते, जर 2 ते 3 हजार कोटी रुपये बोली लावून आयपीएलचा संघ विकत घेणाऱ्या कंपन्या फुटबॉल, हॉकी वा अन्य खेळांसाठी का पुढे येत नाहीत.
क्रिकेटमधून त्यांना कितीतरी पट परतावा मिळतो ही वस्तुस्थिती मान्य आहे; पण जर एखाद्या अन्य खेळातील खेळाडूला प्रायोजकता दिल्यावर तो देखील तुमच्यासाठी ब्रॅंड ठरू शकतो, हे भालाफेकपटू नीरज चोप्रानेही दाखवून दिले आहे. आपल्या देशाच्या फुटबॉलबाबत बोलायचे झाले तर काही वर्षांपर्यंत कोलकाता व गोवा या राज्यांतच हा खेळ खेळला जातो असे मानले जायचे. भुतियाने ही ओळख बाजूला करत देशाच्या कानाकोपऱ्यात हा खेळ पोहोचवला. त्याने रचलेल्या पायावर छेत्रीने कळस चढवला. भुतिया काय किंवा छेत्री काय त्यांना जोवर राजाश्रय मिळत नाही तोपर्यंत या खेळालाही उज्ज्वल भवितव्य आहे, असे वाटत नाही.
आज जगातील एक प्रमुख खेळ असणाऱ्या फुटबॉलचा विचार केला तर त्यात भारतीय संघ खूपच मागे आहे. अन्य गोष्टींबरोबरच फुटबॉलच्याही बाबतीत आपण सध्या विकसनशील आहोत. काही वर्षांपूर्वी भुतिया आणि आता कर्णधार छेत्री यांनी भारतीय फुटबॉलला जागतिक स्तरावरही सिद्ध केले. काही महिन्यांपूर्वी छेत्रीने मेस्सीला मागे टाकले होते. त्यानंतर मेस्सीनेही पुन्हा त्याला ओव्हरटेक केले. हा पाठलाग आता असाच सुरू राहणार फक्त फरक इतकाच की मेस्सी अमाप लोकप्रियतेचा धनी आहे तर छेत्रीच्या वाट्याला देशवासीयांचेही दुर्लक्ष येत आहे.
छेत्रीने 2004 साली भारतीय फुटबॉल संघात पदार्पण केले तेव्हापासून तो आतापर्यंत सातत्यपूर्ण कामगिरी करत खेळत असून, प्रत्येक सामन्यात महत्त्वाची कामगिरी पार पाडत आहे. छेत्रीने पहिला गोल कंबोडियाच्या विरुद्ध 2007 साली केला. त्यानंतर आजवर त्याने 123 सामने खेळताना 77 गोल नोंदवले आहेत. छेत्री सध्या भारतीय फुटबॉल संघाचे नेतृत्व लिलया सांभाळत आहे. सांघिक कामगिरीसह तो वैयक्तिक कामगिरीही सरस करत आहे. सध्या 2022 साली होत असलेल्या फिफा विश्वकरंडक स्पर्धेचे पात्रता सामने सुरू असून, त्यात छेत्री भारतीय संघाला पात्रता मिळवून देण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करत आहे.
छेत्रीच्या आधी भुतियाचे नाव भारतीय फुटबॉल क्षेत्रात आदराने घेतले जाते. सिक्कीमच्या या खेळाडूने आपली किर्ती जागतिक स्तरावरही पोहोचवली. त्याने कारकिर्दीत ईस्ट बंगाल, जेसीटी व मोहन बगानकडून राष्ट्रीय स्तरावर 226 सामने खेळताना गोलचे शतक पूर्ण केले आहे. तसेच त्याने आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये 80 सामने खेळताना 26 गोल केले आहेत. अर्जुन व पद्मश्री हे मानाचे पुरस्कारही त्याला मिळाले. मात्र, देशपातळीवर जे कौतुक वाट्याला यायला हवे होते ते आले नाही.
जे भुतियाच्या बाबतीत घडले तेच काही प्रमाणात छेत्रीच्याही बाबतीत घडताना दिसत आहे. छेत्रीने 123 सामन्यांत 77 गोल केले आहेत. भारताकडून सर्वाधिक आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा व सर्वांत जास्त गोल करणारा तो एकमेव फुटबॉलपटू आहे. त्याला अद्याप देशातील मानाच्या पुरस्कारांपासून वंचित राहावे लागले असले तरीही केवळ पुरस्कार एखाद्या खेळाडूची महानता सिद्ध करत नाहीत हीदेखील एक वस्तुस्थिती आहे. त्याला घरातूनच फुटबॉलचे बाळकडू मिळाले आहे. त्याची आई व दोन जुळ्या बहिणी नेपाळच्या क्लबमधून फुटबॉल खेळलेल्या आहेत.
देशात होत असलेल्या विविध क्लब स्पर्धांमध्ये मिळून छेत्रीने 149 गोल केले आहेत. भुतिया व छेत्री यांनी भारतीय फुटबॉलची अपयशी प्रतिमा पुसून काढली व भारतीय फुटबॉलकडेही गांभीर्याने पाहिले जाऊ लागले आहे. सॅफ स्पर्धेतील किंवा त्यापूर्वीच्याही काही स्पर्धेत छेत्रीने केलेल्या कामगिरीचे कौतुक परदेशातील माध्यमांनी केले, पण भारतीय माध्यमांना त्यासाठी वेळही नाही आणि त्यांचा टीआरपीही वाढणार नाही मग कशाला कष्ट घ्यायचे ही मस्तीखोर वृत्तीच जास्त दिसून येते.
असो, असे म्हणतात की सुपरस्टार अमिताभ बच्चनच्याच काळात जन्माला आले म्हणून विनोद खन्ना, विनोद मेहरा, जितेंद्र, ऋषी कपूर यांच्या वाट्याला पाहिजे तेवढे कौतुक आले नाही. सुनील गावसकरांच्या काळात जन्माला आले म्हणून दिलीप वेंगसरकर, गुंडाप्पा विश्वनाथ, मोहिंदर अमरनाथ यांच्याबाबतही असेच चित्र पाहायला मिळाले होते. सचिन तेंडुलकरच्या काळात जन्माला आल्यामुळे राहुल द्रविड, सौरव गांगुली यांनाही याच परिस्थितीचा सामना करावा लागला.
भुतिया आणि छेत्रीच्या बाबतीत असे काही घडले नाही. मात्र, त्यांच्या जन्माची वेळ नव्हे तर “मित्रांनो, तुमचा देशच चुकला’, असेच म्हणावेसे वाटते. युरोप किंवा अमेरिकेत करोडो लोकांची धडकन बनू शकत असलेल्या या गुणी खेळाडूंना कौतुकाच्या मोजक्याच शब्दांचे धनी व्हावे लागत आहे, हीच खरी शोकांतिका आहे.
अमित डोंगरे