सागर ननावरे
गुलामगिरी, शेकडो वर्षांची परंपरा असणारे एक जोखड. ज्या जोखडात आजही समस्त मनुष्य प्रजाती बांधली गेली आहे. प्रत्येक युगाने या गुलामगिरीच्या व्याख्या बदलल्या. युगानुयुगे चालणारी गुलामी मात्र आपला वारसा या ना त्या कारणाने आजही अबाधित राखून आहे.
प्राचीन काळी सुरू झालेली गुलामी आजच्या युगात तंत्रज्ञान आणि मानसिक गुलामगिरीपर्यंत आपले अस्तित्व राखून आहे. काळ आणि वेळेनुसार या गुलामगिरीची व्याख्या बदलली. या गुलामगिरीच्या अधिपत्याखाली मानवाच्या जगण्यात फारसा फरक पडलेला दिसला नाही. 2 डिसेंबर हा जगभरात जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन म्हणून साजरा केला गेला.
भारताच्या स्वातंत्र्यलढ्याच्या चळवळीने भारतीयांना खऱ्या अर्थाने गुलामगिरीची ओळख करून दिली. यात स्वातंत्र्यपूर्व लढ्यापूर्वीही सामाजिक उच्च-नीच भेदभावाचे चटके समाजाने अनुभवले होते. समाजाला पोखरणारा जाती धर्माच्या भेदभावाने खऱ्या अर्थाने गुलामगिरीचा पाया रचला. वर्णानुसार कामांचे विभाजन केले गेले आणि यातूनच उच्च-नीच, वरिष्ठ-कनिष्ठ असा भेदभावाचा अध्याय सुरू झाला आणि यातून गुलामगिरीची दाहकता समाजाला जाणवू लागली. या गुलामगिरीची विविध कारणे सांगितली गेली. त्यात शिक्षणाचा अभाव हेदेखील गुलामगिरीस कसे पोषक आहे याचेही दाखले दिले गेले. या शिक्षणाच्या अभावाने निर्माण होणारी गुलामगिरीच्या मुळावरच समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी घाव घातला. परंतु गुलामगिरीची खरी भयावहता भारतीयांना अनुभवायला मिळाली ती जुलमी ब्रिटीश राजवटीत. आपल्याच भूमीत जेव्हा आपल्याच लोकांवर अन्याय होतो आणि आपल्याला तो नाईलाजाने सहन करावा लागतो यापेक्षा मोठी खंत काय. ही गुलामगिरीची भावना जगण्यातील संपूर्ण सार हिरावून घेत असते.
वांशिक भेदावर आधारित गुलामगिरी आजही जगाच्या पाठीवर आपले ठाण मांडून आहे. त्यातही पाश्चिमात्य राष्ट्रांसह आंतरराष्ट्रीय स्तरावर नेहमीच गुलामगिरीत राहिलेले निर्वासित आफ्रिकन अद्यापही गुलामगिरीच्या झळा सोसत आहेत. आज अगदी कवडीमोल भावात अशा गुलामांची तस्करी केली जाते. मानवी क्रौर्याची परिसीमा इथे गाठलेली पाहायला मिळते. मात्र अशातही मानवी हक्कांसाठी अगदी जागतिक स्तरावर काम करणाऱ्या संस्थाही याला पायबंद घालू शकल्या नाहीत हे दुर्दैवच म्हणावे लागेल. जागतिक स्तरांवर घेतल्या जाणाऱ्या परिषदांत गुलामगिरीवर अनेक घोषणा केल्या जातात.परंतु प्राण्यांपेक्षा कमी भावात विकल्या जाणाऱ्या गुलामांचे जगणे तसे मानवी मूल्यांची राजरोसपणे चिरफाड करणारेच. आजही गोऱ्या राष्ट्रांत कृष्णवर्णीयांना गुलाम बनवून त्यांच्यावर केले जाणारे अमानवी अत्याचार अतिशय घृणास्पद आहेत. लीबियासारख्या देशातील गुलामांचा भरणारा घोडेबाजार आजही तसाच अबाधित आहे. एका संस्थेने सर्वेक्षण करून दिलेल्या अहवालानुसार आज जगात उपरोक्त प्रकारच्या गुलामांची संख्या 3.7 कोटी असावी असा अंदाज आहे.
एकीकडे दुर्बल आणि हतबल समाजाची ही अवस्था आहे. तर दुसरीकडे तंत्रज्ञानाच्या प्रगतीनंतरही प्रगत राष्ट्रांतील अनौपचारिक गुलामी काही कमी झालेली नाही. तंत्रज्ञानामुळे मनुष्यबळ कमी प्रमाणात लागते मात्र यातून यांत्रिक गुलामगिरीच्या पर्वाला सुरुवात झाली. तंत्रज्ञानाने मानवी सामर्थ्याची जागा घेत कधी मानवाला गुलाम केले हे समजलेही नाही. आज सुशिक्षित आणि प्रगत जनसमुदायात मोबाइल, इंटरनेट, सोशल मीडिया, व्हर्चुअल रियालिटी याबाबत प्रचंड क्रेझ आहे. आणि ही क्रेझ आजच्या मानवाच्या गुलामगिरीसाठी कारणीभूत ठरत आहे. या तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊन आज जगण्यात अर्थ शोधला जातो. तंत्रज्ञान हा जणू जगण्याचा मुख्य आधारच बनू लागला आहे. आज या व्हर्चुअल रियालिटीने मानवी मेंदूचा चांगलाच ताबा घेतला आहे. तंत्रज्ञानाला गुलाम करण्यासाठी त्याची निर्मिती झाली परंतु आज तंत्रज्ञानानेच मानवाला गुलाम केले आहे.
आज एकविसाव्या शतकातही माणूस विविध गुलामगिरीचा बळी ठरत आहे. आर्थिक, सामाजिक, राजकीय आणि अध्यात्मिक गुलामगिरीनेही समाजात मोठे बस्तान बसविले आहे. या सर्वांना कारणीभूत ठरणारी सर्वांत मोठी गुलामगिरी म्हणजे मानसिक गुलामगिरी. गुलामगिरीसाठी मुख्य कारण काय असेल तर मानसिक गुलामगिरी. केवळ स्वतःच्या मनस्थितीला किंबहुना मानसिक सामर्थ्याला अधिक प्राधान्य न दिल्याने ही गुलामगिरीची भावना निर्माण होत असते.
मुळात आज जगातील प्रगतीचा वेग कितीही सुसाट असला तरी मोठ्या प्रमाणात मानवी जीवनात गुलामगिरीचा शिरकाव झालेला पहावयास मिळतो.
2 डिसेंबर 2009 साली जागतिक गुलामगिरी मुक्तता दिनी युनोचे तत्कालीन सरचिटणीस बान की मून यांनी जगाला एक संदेश दिला होता. ज्यात त्यांनी म्हटले होते की, “”गुलामगिरीचे उच्चाटन केवळ कायद्याने होणार नाही. या मोहिमेत गरिबी हटाव, साक्षरता प्रसार, लैंगिक समानता, हिंसेचे उच्चाटन हे कार्यक्रमदेखील अंतर्भूत व्हायला हवेत. आजही जगभरातील गुलामगिरीची उदाहरणे पाहता बान की मून यांनी दिलेल्या संदेशातील गांभीर्य लक्षात घेणे गरजेचे आहे. हे गांभीर्य लक्षात घेऊन त्यानुसार उपाययोजना झाल्यावरच खऱ्या अर्थाने जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन साजरा होईल.