पंढरपूर – ग्रामीण भागातील मुलींतील कौशल्य विकसित होण्यासाठी त्यांना प्राधान्याने प्रशिक्षण द्यावे. या प्रशिक्षणामध्ये मुलींचा समावेश 30 टक्के राहील याबाबत कार्यवाही करावी, अशा सूचना कौशल्य विकास व उद्योजकता विभागाचे राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी दिल्या.
शासकीय विश्रामगृह अकलूज येथे गृह (ग्रामीण), वित्त, नियोजन, राज्य उत्पादन शुल्क, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, पणन विभागांची जिल्हास्तरीय आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
राज्यमंत्री देसाई म्हणाले, ग्रामीण भागातील मुला-मुलींना सक्षम करण्यासाठी कौशल्य विकास विभागाने प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. आरोग्य सेवेशी निगडित प्रशिक्षणाचा समावेश प्राधान्याने असावा. सोलापूर जिल्ह्याला अन्य राज्याची सीमा लागून आहे. सीमा भागातून होणारी चोरटी मद्य वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाने आवश्यकती कार्यवाही करावी. पणन विभागाने शेतकऱ्यांना व्यक्तिगत लाभाच्या योजना उपलब्ध करून द्याव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
राज्याच्या ग्रामीण भागातील पोलीस निवासस्थाने आणि पोलीस ठाण्यांच्या इमारत बांधकामातील विविध समस्या असून, पोलिसांना आवश्यक असणाऱ्या सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे. ग्रामीण भागातील पोलीस वसाहतीचे प्रस्ताव तत्काळ पाठवावेत. प्रस्तावाचा पाठपुरावा करुन निधी उपलब्ध करुन दिला जाईल. पंढरपूर येथील पोलीस वसाहतीबाबत सादर केलेल्या प्रस्तावावर तात्काळ कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.