नवी दिल्ली – भाजपच्या राज्यातील नेत्यांचा दिल्ली दौरा दोन दिवसांपासून सुरू आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदावरून चंद्रकांत पाटील यांची उचलबांगडी होण्याची चर्चा सध्या जोरदार सुरु आहे. मात्र चंद्रकांत पाटील यांनी या सर्व चर्चा फेटाळून लावल्या आहेत.
चंद्रकांत पाटील यांनी आज दिल्लीत केंद्रीय मंत्री नारायण राणेंची भेट घेतली. भाजप नेत्यांचा दिल्लीचा दौरा सुरू होताच राज्य संघटनेने बदल होतील, अशा प्रकारच्या वृत्तांना हवा मिळाला सुरुवात झाली.
याबाबत चंद्रकांत पाटील म्हणाले, भाजप प्रदेशाध्यक्ष बदलण्याच्या चर्चा आमच्या पक्षात नसून या चर्चा फक्त मीडियात आहेत. प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा विचारही नाही. भाजपमध्ये प्रदेशाध्यक्ष बदलण्याची एक प्रक्रिया आहे. तीन वर्षांचा कार्यकाळ मिळतो. दर तीन वर्षाने आमच्या पक्षात फेरबदल होतो. अगदी ग्रासरुटच्या पदापासून ते राष्ट्रीय अध्यक्षपदापर्यंत हा बदल होत असतो, असे पाटील म्हणाले. कॉंग्रेसला अद्याप पक्षाचा अध्यक्ष मिळाला नाही. भाजपाचे तसे नाही, असा टोला त्यांनी लगावला.
तसेच दिल्लीत येण्यामागे कुठलाही राजकीय हेतू नाही. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राज्याला केंद्रीय मंत्री मिळाले. दिल्लीत येऊनही त्यांचे अभिनंदन करणे आवश्यक होते. त्यामुळे मी दिल्लीत आलो. प्रत्येक मंत्र्यांची खाती समजून घेत त्यांचा राज्याला कसा फायदा होईल यावर या भेटीत चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, चंद्रकांत पाटील, राज्य सरचिटणीस चंद्रशेखर बावनकुळे, राम शिंदे, जयप्रकाश रावल, संजय कुटे, श्रीकांत भारतीय आदींचा दिल्ली दौरा आगामी 10 ऑगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. केंद्रात महाराष्ट्रातून नियुक्त झालेले सर्व केंद्रीय मंत्र्यांना सोबत या भाजपच्या नेत्यांची भेट होणार आहे.