कोलंबो – श्रीलंकेत साखळी बॉंम्बस्फोटांची घटना घडल्यानंतर त्या देशाने सहाशे विदेशी नागरीकांची श्रीलंकेतून हकालपट्टी केली आहे. त्यात दोनशे इस्लामिक मौलवींचा समावेश आहे. या मौलवींनी श्रीलंकेत बेकायदेशीर प्रवेश मिळवला होता असे तपासात निष्पन्न झाल्यानंतर त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आल्याचे त्या देशाचे गृहमंत्री वजिरा अबेवर्देना यांनी सांगितले. सध्याची देशाच्या सुरक्षेची स्थिती लक्षात घेऊन आता आम्ही व्हिसा निर्बंध अधिक कडक करण्याचा निर्णय घेतला आहे असेही त्यांनी म्हटले आहे. श्रीलंकेतील अलिकडेच झालेल्या साखळी बॉंम्बस्फोटांमध्ये एकूण 257 जण ठार तर पाचशेच्यावर लोक जखमी झाले आहेत. श्रीलंकेतील ख्रिश्चन धर्मियांना लक्ष्य करण्यासाठी हे स्फोट ईस्टर संडेच्या दिवशी घडवण्यात आले होते.