लोणी धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील दुष्काळग्रस्त सहा गावांना चार ते पाच कि. मी. अंतरावरून जात असलेल्या डिंभे धरणाच्या उजव्या कालव्याचा कुठलाही फायदा होत नाही, त्यामुळे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी पावसावर पूर्णपणे अवलंबून राहावे लागत आहे.
या परिसरात मागील दोन वर्षांपूर्वी सात ते आठ महिने पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू होते. वडगावपीर (ता. आंबेगाव) येथे मागील वर्षी पावसाने चांगली हजेरी लावल्याने परिसरातील ओढे, नाले, विहिरींना मुबलक पाणी होते, ते पाणी मार्चअखेर कसेबसे टिकले.
मात्र, एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात ओढे, नाले कोरडे ठणठणीत पडले असून, परिसरातील विहिरींची पाणी पातळीही खोल गेली आहे. येथील पाणीटंचाई लक्षात घेता टॅंकर सुरू करावा, अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत.
ग्रामपंचायतीने टॅंकर सुरू करण्यासंदर्भात पंचायत समिती घोडेगाव येथे प्रस्ताव सादर केला असून, तात्काळ टॅंकर सुरू करावा, अशी मागणी सरपंच मीरा पोखरकर व उपसरपंच रवींद्र गुळवे यांनी केली आहे.
मागील दोन तीन वर्षांचा विचार केला तर येथे आक्टोबर-नोव्हेंबर मध्येच पाण्याचा टॅंकर सुरू करावा लागत होता; पण गेल्या वर्षी पावसाने दमदार हजेरी लावल्याने मार्चअखेरपर्यंत पाणी पुरले. मात्र, या पुढे पिण्यासाठी पाण्याच्या टॅंकरशिवाय पर्याय नाही.
– संजय पोखरकर, माजी सरपंच