केंद्रीय समितीकडून कौतुक : नियंत्रण कक्षाच्या कार्याचा आढावा
पुणे – करोना प्रतिबंधासाठी जिल्हा परिषदेने केलेल्या उपाययोजना सर्वांसाठी पथदर्शी आहेत. नागरिकांच्या समस्यांना तातडीने प्रतिसाद देण्यासाठी सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष हा चांगला उपक्रम असून जिल्ह्यातील करोना संबंधीच्याच नव्हे, तर सर्व प्रकारच्या समस्या तातडीने सोडवण्यात येत आहेत. हा उपक्रम भविष्यातही सुरू राहावा, अशा सूचना देत जिल्हा परिषदेच्या कार्याचे कौतुक पुण्यात आलेल्या केंद्रीय समितीने केले.
जिल्ह्यातील करोना प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच सध्या शासकीय यंत्रणा कशा पद्धतीने कार्य करत आहेत, याची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती गेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात आली आहे. या समितीत उर्जा मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव संजय म्हलोत्रा, केंद्रीय आरोग्य सेवेचे अतिरिक्त महासंचालक डॉ. पी. के. सेन, राष्ट्रीय आपत्ती निवारण विभागाचे संयुक्त सल्लागार डॉ. पवन कुमार सिंग, डॉ. अरविंद अलोने, अन्न आणि पुरवठा विभागाचे संचालक करमविर सिंग यांचा समावेश आहे.
या समितीने बुधवारी पुणे जिल्हा परिषदेला भेट देत कामकाजाची माहिती घेतली. जिल्हा परिषदेतर्फे राबविण्यात येणाऱ्या एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमाची समितीने माहिती घेतली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद तसेच सर्व विभागाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते. या सर्वेक्षणाअंतर्गत माहिती घेताना राज्य शासन आणि केंद्राकडून वेगवगळी माहिती मागविली जाते. तसेच रुग्णांची माहिती घेतांनाही वेळ लागतो.
यामुळे दोन्ही यंत्रणांनी एकत्र माहिती घेतल्यास वेळेची बचत होईल, अशी मागणी आयुष प्रसाद यांनी समितीकडे केली. जिल्हाधिकारी यांच्या सूचनांनुसार जिल्हा परिषदेत नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला आहे. या कक्षात दिलेल्या टोल फ्री क्रमांकावर रोज अनेक फोन येतात.
नागरिकांच्या आरोग्य विषयक तक्रारींसोबतच अनेक तक्रारी येत असतात. या सर्व तक्रारींचे निरस्सरण या कक्षाद्वारे करण्यात येत आहे. जिल्ह्यात आशा सेविकांमार्फत करण्यात येत असलेल्या सर्वेक्षणाचेही कौतूक समितीने केली. या कक्षात निवारण करण्यात आलेल्या एका तक्रारदाराला समितीने फोन करत माहिती घेतली. एखादी घटना घडल्यावर नियंत्रण कक्षातर्फे देण्यात येत असलेला तात्काळ प्रतिसाद समितीला आवडला.
ग्रामीण भागात करोनावर नियंत्रण
जिल्हा परिषदेने करोना प्रतिबंधासाठी अनेक उपाययोजना केल्या. आरोग्य यंत्रणेमार्फत मिळणारा तात्काळ प्रतिसाद, जिल्ह्यात होणारे सर्वेक्षण यामुळे जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी आहे. हे यंत्रणेचे यश आहे, अशी भावना समितीतील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. कॅन्टोमेंन्ट परिसरात रुग्णांची संख्या जास्त दिसत असल्याने, नगर पालिका तसेच इतर यंत्रणांनी यावर आणखी उपाय योजना करून ही संख्याही नियंत्रित करावी, अशा सूचना समितीन केल्या आहेत.