अमरावती – अमरावती जिल्ह्यातील परतवाडा ते बैतूल मार्गावर एसयूवी चारचाकी वाहनाने दुचाकीला दिलेल्या धडकेत 6 जणांचा मृत्यू, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. ही दुर्घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास निंभोरा फाट्यानजीक घडली. बोदड, कारंजा बहिरम, खरपी या गावांमधील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवण्यासाठी ही कार जात होती.
परतवाडा येथील एका हार्डवेअरच्या दुकानात काम करणाऱ्या मजुरांना संततधार पावसामुळे त्यांच्या गावी सोडण्यासाठी दुकान मालकाने त्यांच्यासाठी स्वत:ची कार दिली आणि चालकाला वाहन सोपविले. बैतूल मार्गावर भरधाव वेगातील कार दुचाकीला धडकली. त्यानंतर कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले कार थेट नाल्यात कोसळली.
या अपघातात कारमधील पाच जणांपैकी चौघांचा, तर दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला. तर अन्य एक जण गंभीररीत्या जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाताची नोंद शिरजगाव पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहे.