रायपुर – छत्तीसगड मधील दंतेवाडा जिल्ह्यात आज सहा नक्षलवाद्यांनी सीआरपीएफ पुढे शरणांगती पत्करली. हे सहा नक्षलवादी माओवाद्यांच्या बरसूर भागातील समितीत कार्यरत होते. सरकारच्या पुनर्वसन प्रकल्पामुळे आम्ही प्रभावित झालो असून माओवाद्यांच्या विचारसरणीमुळे आमचा भ्रमनिरास झाला आहे त्यामुळे आम्ही शरणांगती पत्करत आहोत असे त्यांनी म्हटले आहे.
शरण आलेले नक्षलवादी 24 ते 47 वयोगटातील आहेत. त्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल असून त्यांना पकडून देण्यासाठी पोलिसांनी प्रत्येकी दहा हजार रूपयांचे बक्षिस लावले होते. हे सहाही नक्षलवादी बसरूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी आहेत.
सरकारने नक्षलवाद्यांनी शस्त्रे खाली ठेऊन समाजाच्या मुख्य प्रवाहात सामिल व्हावे यासाठी घराकडे परता असे त्यांना आवाहन करणारी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत आत्तापर्यंत 437 नक्षलवाद्यांनी शरणांगती पत्करली आहे.