थिरुवनंतपुरम – केरळममध्ये गाजलेल्या सिस्टर अभया हत्या प्रकरणात फादर थॉमस कोट्टूर (वय 63) आणि सिस्टर सेफी यांना काल दोषी ठरवल्यानंतर बुधवारी त्यांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली. हा गुन्हा नोंदवण्यात आल्यानंतर 28 वर्ष नऊ महिन्यांनी त्याचा निकाल लागला.
हे आरोपी जामीनावर 2009 पासून बाहेर होते, त्यांना हा निकाल दिल्यानंतर तासाभरात पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले. कोट्टूर आणि सेफी हे या प्रकरणात पहिल्या आणि तिसऱ्या क्रमांकाचे आरोपी होते. सीबीआयच्या आरोपपत्रात फसदर जोस पुथ्रिक्कयल यांचे नाव आरोपी क्र.2 म्हणून होते. मात्र पुरेशा पुराव्या अभावी या खटल्यातून त्यांना वगळण्याची मागणी न्यायलयाने गेल्या वर्षी मान्य केली होती.
कोट्टयममध्ये या 19 वर्षीय सिस्टर निर्मलाचा मृतदेह कॉन्व्हेंट हायस्कूलच्या आवारातील विहिरीत सापडला. त्यावेळी या प्रकरणाची माध्यमांमध्ये मोठी चर्चा झाली होती. 27 मार्च 1992 ला सिस्टर अभयाचा मृतदेह सापडला होता. कॉन्व्हेंटच्या स्वयंपाकघरात सेफी आणि दोन धर्मगुरू आक्षेपार्ह स्थितीत पाहिल्यानंतर तिचा खुन करण्यात आला होता, असे परिस्थितीजन्य पुराव्यावरून हा खटला दाखल करताना सीबीआयने सांगितले होते.
अभया प्रकरण हे केरळमधील सर्वात दीर्घकाळ चालणारे हाय प्रोफाईल खून प्रकरण ठरले आहे. या ननच्या हत्येनंतर 16 वर्षांनी या आरोपींना सीबीआयने नोव्हेंबर2008मध्ये अटक केली होती. या खटल्यात 49 साक्षिदारांपैकी आठ साक्षिदार फुटले. ते बहुतांश चर्चच्या निकटवर्तीय वर्तुळातील होते.
या खटल्यात अडक्का राजू यांची साक्ष महत्वाची ठरली. त्याने सांगितले, 27 मार्च 1992ला पहाटे होस्टेलच्या जीन्यातून खाली जाताना दोघांना पाहिले होते. त्याला या इमारतीच्या आवारातून तांबे चोरी करण्याच्या प्रकरणात अटक झाली होती.