हटाव कृती समिती आक्रमक : आंदोलनावेळी दिलेला शब्द कसा पाळणार?
खेड शिवापूर – खेड शिवापूर टोलनाक्यावर दि. 1 जानेवारीपासून सरसकट फास्टॅग सुरू होणार आहे. त्यामुळे 16 फेब्रुवारी 2019च्या आंदोलनावेळी दिलेले आश्वासन केराच्या टोपलीत जाणार आहे, हे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व खेड शिवापूर टोलनाका प्रशासनाने घेतलेल्या निर्णयावरून स्पष्ट होत आहे, असा आरोप खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने केला आहे.
खेड शिवापूर टोलनाका हटाव कृती समितीने त्यांची भूमिका मांडण्यासाठी पत्रकार परिषद बोलावली होती. जिल्हाधिकारी तसेच इतर प्रशासनाने कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी मागील आंदोलनावेळी आश्वासने दिली होती; परंतु, ही आश्वासने आता कचराकुंडीत जाणार हे नक्की. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार संग्राम थोपटे यांनी तातडीने निर्णय घेणे गरजेचे आहे.
सर्वच खात्यातील अधिकारी तसेच आमदार, खासदार यांना परिस्थितीची माहिती असूनही मुदतवाढ कशी मिळते, हा मोठा संशोधनाचा मुद्दा आहे. हा महामार्ग वाहतुकीसाठी असुरक्षित आहे, असा दाखला प्रशासनानेच दिलेला आहे.
10 वर्षांत जवळपास 1052 नागरिकांचा मृत्यू या खराब रस्त्यामुळे झाला आहे. यातून या मार्गावर बहुतांशी कामेही अपुरी आहेत, अशा स्थितीत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण प्रकल्प संचालक सुहास चिटणीस यांची बदली करत नाही, याचे कारण अजूनही अस्पष्ट आहे.