आमदार चंद्रकांत पाटील यांचे प्रतिपादन
कात्रज/आंबेगाव बुद्रुक – कारगिल युद्धात विजय मिळावा यासाठी शत्रूंशी प्राणपणाने आपले सैनिक लढले. या योद्ध्यांचे स्मरण करण्यासाठी कारगिल विजय दिवस आपण साजरा करतो. करोना विषाणूच्या विरोधात लढण्यासाठी करोना योद्धेही प्राणपणाने लढत आहेत. हेच कारगिल आणि करोना योद्धा यांच्यातील साम्य आहे, असे मत भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले.
सरहद संस्थेच्या वतीने करोना योद्ध्यांना कारगिल गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. सरहद संस्थेत सोशल डिस्टन्सिंग अंतर्गत झालेल्या कार्यक्रमात भाजप प्रदेश सचिव राजेश पांडे, सरहद संस्थेचे संजय नहार, संजीव शहा, निखिल शहा, वैभव वाघ, शैलेश वाडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी सचिन जामगे, डॉ. अमोल देवळेकर, डॉ. दीपा अमोल देवळेकर यांना कारगिल गौरव पुरस्काराने तर रुग्णवाहिकेचे चालक तेजस कराळे, सुशील कराळे आणि विकास काजळे यांचा कारगिल विशेष सन्मान देऊन गौरवण्यात आले.