सुशील जाधव
विभागीय व्यवस्थापक,
लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड,
पुणे.
माणसाच्या आयुष्यात आत्मनिर्भरता ही योग्य वेळी केलेल्या गुंतवणुकीतून येते. अनेक मार्गांपैकी हा एक महत्त्वाचा मार्ग.ही गुंतवणूकच तुम्हाला कठीण, आव्हानांच्या काळात निश्चिंतता देते. मग ती गुंतवणूक सामान्य माणसाच्या दररोजच्या छोट्या-छोट्या बचतीमधली असेल, मध्यमवर्गीयांच्या वार्षिक नियोजनातून असेल वा उच्चभ्रू गटातील कुटुंबाची असेल…सर्वांचा मार्ग वेगवेगळा असला तरी ध्येय एकच असते. गुंतवणुकीची गरज सध्याच्या कोरोनाच्या काळात आपण सारेजणच अनुभवतो आहोत. मात्र अशा निश्चिंतता देणाऱ्या गुंतवणुकीसाठी हवी विश्वासार्ह वित्तीय संस्था. ती संस्था विश्वासार्ह हवी पारदर्शक व्यवहार करणारी हवी आणि त्यासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने सज्ज व सुविधांनी परिपूर्णही हवी. अशी साऱ्या गोष्टी एकाच वित्तीय संस्थेच्या ठायी असणे म्हणजे परिपूर्णताच…
समाजातील सर्व स्तरातील ग्राहकांसाठीची आवश्यक परिपूर्णता लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या ठायी आहे. असे म्हटल्यास अधिकचे होणार नाही. देशभरातील ग्राहक व पुणेकरांच्या विश्वासाच्या बळावर ही वाटचाल अजूनही अशीच प्रगतीच्या दिशेने सुरू आहे. मराठी अस्मिता व भाषाप्रेम मनी बाळगून एकमेंकांना मदतीचा संदेश देत विशेषतः तरूणांच्या हाताला रोजगार मिळावा, याउद्देशाने मा. श्री. किरण ठाकूर यांनी बेळगावमध्ये दि. 31ऑगस्ट 1995 लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटीची स्थापना केली, त्यास (सोमवार, 31ऑगस्ट 2020) पंचवीस वर्षे पूर्ण होत आहेत. हा रौप्य महोत्सवी वर्षाचा प्रवास जसा आनंददायी आहे, तसा अभिमानाचा, ग्राहक विश्वासाचा व समाधानाचा देखील आहे…
लोकमान्य ग्रूपचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. किरण ठाकूर यांनी स्थापन केलेल्या लोकमान्य सोसायटीने आज सहकार क्षेत्रातील पथदर्शी अग्रदूत म्हणून लोकमान्यता मिळवली आहे.
पारदर्शक व्यवहार व विश्वासाच्या बळावर सोसायटीने आंतरराज्यातही आपल्या कार्यविस्ताराची व्याप्ती वाढविली आहे. कर्नाटकानंतर गोवा, महाराष्ट्र राज्यात आणि राजधानी दिल्लीत सोसायटीच्या शाखांच्या रूपाने आज जाळे विस्तारले आहे.
2008 साली सोसायटीचे रूपांतर मल्टिपर्पज सोसायटीत झाले. व्यावसायिक पातळीचा विचार करता खासगी व राष्ट्रीयकृत क्षेत्रातील सर्वोत्तम वित्तीय संस्थांच्या तोडीची सेवा आज लोकमान्य सोसायटी देते आहे. ही सेवा आधिकधिक ग्राहककेंद्रित व अत्याधुनिक कशी होईल, याकडे सोसायटी प्रयत्नरत आहे आणि याच सेवा व विश्वासाच्या बळावर लोकमान्य सोसायटी आर्थिक क्षेत्रात आज खासगी व राष्ट्रीयकृत बॅंकेसारखाच एक यशस्वी ब्रॅंड बनलेला आहे. जो पुणेकरांच्याही पसंतीत उतरलेला आहे.
देशभरात असलेल्या लोकमान्य सोसायटीच्या 213 शाखांच्या माध्यमातून चार हजार आठशे कोटींहून अधिक ठेवींचा टप्पा सोसायटीने गाठलेला आहे. यासोबतच सोसायटीने ग्राहककेंद्रित व विविध पूरक सेवांमध्ये देखील उल्लेखनीय काम केले आहे.
लोकमान्य सोसायटीचा आज असलेला कार्यविस्तार हा अभिमानास्पद व आनंददायी आहे. सोसायटीच्या स्थापनेमागे ठेवलेल्या ध्येयानुसार आज 50 हजारांहून अधिक युवकांना प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे रोजगार मिळाला आहे. ही प्रक्रिया अद्यापही सुरूच आहे.
कोरोनाच्या आपदेने सारे जग बदलाच्या एका नव्या उंबरठ्यावर उभे आहे. पण एक गोष्ट समाधान आणि प्रोत्साहन देणारी म्हणजे या कोरोना आपदेच्या काळातही अनेक ग्राहकांनी सोसायटीवरील विश्वास अधोरेखित करीत मुदतठेवींच्या रूपाने गुंतवणूकीचा ओघ कायम ठेवला.
कोरोना आपदेदरम्यान लोकमान्य ने ग्राहकाभिमुख सेवेचे व्रत किंचीतही नाकारले व सोडले नाही. यासोबतच नेहमीप्रमाणे लोकमान्यने कोरोना काळातही समाजऋणाच्या भावनेतून सामाजिक संस्थांच्या मदतीने गरजूंना धान्य, औषधांची उपलब्धता करून दिली.
आरोग्य विभाग व पोलिस विभागातील कोरोना योद्ध्यांसाठी मास्क, सॅनिटायझर, भोजन, फेसशिल्डच्या माध्यमातून मदतरूपी सक्रिय पाठिंबा दिला. त्याशिवाय मुख्यमंत्री व पंतप्रधान मदतनिधीसाठी भरीव अशी आर्थिक मदत दिली.
लोकमान्य सोसायटी प्युअर बॅंकिंग सेक्टर नसली, तरी ग्रामीण व शहरी अर्थव्यवस्थेला जोडणारा दुवा आहे. विश्वास आणि पारदर्शकता हे तत्व ज्या विचार व कृतीचा पाया आहे, अशा सहकार क्षेत्रातील रौप्यमहोत्सवी व यशस्वी वाटचाल केलेले पथदर्शी, अग्रदूत आम्ही आहोत; या जबाबदारीची जाणीव आम्हाला आहे.
ही जाणीव लोकमान्य सोसायटीवर ग्राहकांनी कोरोना काळात दाखविलेल्या विश्वासामधून आम्ही अधिक जवळून अनुभवली आहे….आणि यापुढील काळात यश शिखराकडे वाटचाल करताना आम्हा सर्वांची जबाबदारी अधिक वाढलेली आहे याचे भानही आम्हाला आहे.
मा. श्री. किरण ठाकूर यांच्या नेतृत्वात लोकमान्य ग्रूपने आज सर्वच क्षेत्रात आघाडी घेतली आहे.
प्रसारमाध्यम क्षेत्रात आधीपासूनच कार्यरत असलेल्या या समुहाने आज शिक्षण, आरोग्य, आदरातिथ्य (हॉस्पिटॅलिटी), बांधकाम व पायाभूत सुविधा क्षेत्र, बॅंक्वेट हॉल व टूर्स अँड ट्रॅव्हल क्षेत्रांत आपला कार्यविस्तार करीत आघाडी घेतली आहे. सहकाराच्या क्षेत्रात संस्कृती संरक्षित, संवर्धित झाली पाहिजे. हे करताना आपण राष्ट्रीयत्वाची भावना जपली पाहिजे. आपण समाजासाठी, लोककल्याणासाठीच जगले पाहिजे आजही या भावनेनेच लोकमान्य ग्रूपचा प्रवास प्रगतीच्या दिशेने सुरू आहे.
शब्दांकन
नरेंद्र जोशी