आपली संस्कृती ही आपल्याला कोणाच्याही ऋणात राहायला शिकवत नाही. तर उलट ज्याने त्याने शक्यतो आपापल्या परीने ती ऋणं किमान काहीअंशी तरी फेडण्याचा प्रामाणिक प्रयत्न करावा, हेच आपल्याला सांगितले आणि शिकविले जाते. माणसावर त्याच्या जन्माबरोबरच काही ऋणंही येतात. त्यातली काही ऋणं तर कधीच न फेडली जाणारी नसतात. त्यातले, जन्मदात्रीचे, पित्याचे, गुरूंचे आणि आपल्या जन्मभूमीचे ऋण हे असे असते की ते कधीच फिटत नाही.
अशावेळी किमान त्यांची सेवा करून, त्यांचा आदर मान राखून, त्यांच्या शब्दाचे, शिकवणीचे, आज्ञेचे पालन करून आपण ते ऋण काही अंशाने तरी अवश्य परत फेडले पाहिजे. तसे करणे हे आपले आद्यकर्तव्यच आहे. कारण आपली संस्कृती नेहमीच आपल्याला कृतघ्न नाही तर कृतज्ञ राहण्याचा सल्ला देत असते.
ऋणांचे प्रकार वेगवेगळे असले तरी ऋण ते ऋणच. मग ते कौटुंबिक असो, सामाजिक असो नाही तर राष्ट्रीय असो. कौटुंबिक ऋण हे आपल्या वरील जबाबदाऱ्या पूर्ण करून, आपल्यावर ज्यांनी काही उपकार केले आहेत, अडीअडचणीच्या वेळी जे आपल्या मदतीला धावून आले आहेत, त्यांनाही त्यांच्या अडीअडचणीच्या वेळी सहकार्याचा हात पुढे करून हे ऋण काही अंशानी तरी फेडता येते.
उपकाराची परतफेड ही परोपकारानेच करायला आपला देश आणि धर्म आपल्याला शिकवतो. ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो त्या समाजाचे आपल्यावरचे ऋण हे फार मोठे अन् व्यापक स्वरूपाचे असते. त्याची परतफेड करताना मी आणि माझे ह्याचा संकुचित विचार करून चालत नाही. अशा वेळी “आपण सारे’ ही वैचारिक व्यापकता अंगी बाणवावी लागते.
सामाजिक ऋण फेडण्याच्या संधी ह्या शोधाव्या लागत नाहीत. अनेकदा त्या निसर्गच आपल्याला उपलब्ध करून देत असतो. गाव, राष्ट्र, देश किंवा जग ह्यामधील कोणालाही कोणत्याही स्वरूपाची मदत करायला आपत्तीकाळात मोठा वाव असतो. अशा प्रसंगी आर्थिक स्वरूपाची, अन्नधान्याची, औषधपाण्याची, पुनर्वसनाची मदत करण्यासाठी अनेक व्यक्ती, सामाजिक संस्था पुढे येतात. अशा स्वरूपाच्या मदतीला धावून जाणे, त्यात आपापल्या परीने ज्याने त्याने खारीचा का होईना पण वाटा उचलणे हे आपले सर्वांचे कर्तव्य आहे, हे विसरून चालणार नाही.
– अरुण गोखले