तातडीचे धोरणात्मक निर्णय घेण्याचा नाणेनिधीचा भारताला इशारा
वॉशिंग्टन : भारतात लक्षणीय आर्थिक मंदीची स्थिती निर्माण झाली असून त्यावर उपाययोजना करण्यासाठी भारताने तातडीची धोरणात्मक कृती करण्याची गरज आहे असा इशारा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने दिला आहे. नाणेनिधीने दिलेला हा इशारा मोदी सरकारसाठी नामुष्कीजनक मानला जात आहे.
नाणेनिधीच्या सोमवारी जाहीर झालेल्या अहवालात संचालकांनी नमूद केले आहे की भारताने मागील काही काळात लक्षावधी लोकांना दारिद्रय रेषेच्या बाहेर काढून चांगली कामगिरी केली असली तर चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीची स्थिती पहाता भारतातील आर्थिक विकासाला खीळ बसल्याचेच दिसून येते.
भारतात आलेली ही मंदीची स्थिती सायक्लिकल स्वरूपाची आहे असे मानायला अजूनही जागा आहे. पण त्यातून बाहेर येण्याची स्थिती वाटते तितकी सोपी नाही असे नाणेनिधीच्या भारत मिशनचे प्रमुख रानील सलगादो यांनी म्हटले आहे. भारताचा विकास दर साडे चार टक्क्यांपर्यंत घसरला आहे.
देशांतर्गत मागणीच्या प्रमाणात पुरेशा प्रमाणात वाढ होताना दिसत नाही. डिसेंबर महिन्यातीलही भारतातील आर्थिक स्थिती अत्यंत नाजुक बनली आहे अशी निरीक्षणेही नाणेनिधीने नोंदवली आहेत. जीएसटी सारख्या सुधारणा यशस्वीपणे राबवण्यात आलेल्या अडचणींचाही नाणेनिधीने उल्लेख केला आहे.
भारतातील खासगी गुंतवणूक मंदावली आहे, व्यवसाय क्षेत्रात आत्मविश्वासाचा अभाव निर्माण झाला आहे असेही सलगादो यांनी नमूद केले. जानेवारी महिन्यात विकासदराच्या संबंधातील जे चित्र समोर येईल ते मागच्या वर्षीपेक्षाही खालावलेले असेल असे निरीक्षणही त्यांनी भारताच्या बाबतीत नोंदवले आहे.