नगर – शहरात डझनभर ठिकाणी सिग्नल बसविण्यात आले आहेत मात्र त्यातील काही दिवे उद्घाटना नंतर लगेचच बंद पडले होते. मात्र गेल्या काही दिवसात दैनिक प्रभातने याबाबतचे वृत्त प्रसिद्ध केल्याने मनपा आणि शहर वाहतुक पोलीसांना जाग आली आणि काल (दि. 24 रोजी )मार्केट यार्ड चौकातील सिग्नल पुन्हा सुरू करण्यात आले.
शहर आणि उपनगरात किमान बाराठिकाणी वाहतुक नियमन करणारे दिवे बसविण्यात आले असून त्यापैकी सहाते सातच दिवे सुरू होते मात्र दैनिक प्रभातच्या वृत्ताने मनपा प्रशासन आणि शहर वाहतूक पोलीस यंत्रणेला वृत्ताची दखल घायला भाग पाडले आणि त्यातून काही दिवसांपूर्वी स्टेट बॅंक चौकातील वाहतूक नियमन दिवे सुरू झाले आता नुकतेच मार्केट यार्ड चौकातील वाहतूक नियमन दिवे सुरू करण्यात आले आहेत.
मार्केट यार्ड चौकातील वाहतुक नियमन दिवे सुरू झाले खरे मात्र, त्यातून एक वेगळीच समस्या उदभवली असून त्यामुळे तेथील वाहतूक नियमन फसते की काय अशी शंका येवू लागली आहे. त्याचे कारण असे की, या चौकातून पाच रस्ते जात असल्याने जुन्या वसंत टॉकिजकडून येणाऱ्या रस्त्यासाठी अत्यंत कमी वेळात दिवे नियमन करीत असल्याने त्याबाजूने येणाऱ्या वाहनांना रस्ता ओलांडण्याकरीता पुरेस वेळ मिळत नाही त्यामुळे हे वाहन चालक मध्येच घुसण्याचा प्रयत्न करीत असल्याने तेथेच अपघाताला निमंत्रण मिळण्याची शक्यता वाढली आहे तसेच या चौकातून पुढे गेल्यानंतर सहकार सभागृहाच्या बाजूने येणाऱ्या वाहनांना रस्ता नसल्याने ते रस्त्याच्या चुकिच्या बाजूने चौकापर्यंत येतात.
त्यावेळीही अपघाताची मोठी शक्यता असते.मार्केटयार्डातूनही बाहेर येतांनाही एकेरी वाहतूक असल्याने तेथून बाहेर पडण्यासाठीही गर्दी होत असल्याने तेथेही अपघाताची शक्यता आहे. शिवाय या वाहतूक नियमन दिव्यांचा सुरू बंद होण्याचा कालावधी 30 ,40 आणि साठ सेकंद असल्याने तोही अवधी पुरेसा नसल्याचे वाहतूक पोलिसांच्या वतीने सांगण्यात येत आहे. या दोन तीन समस्यांचे निराकरण कसे करायचे असा यक्ष प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे.