खडकवासला – वाहतूक पोलिसांची वसुली मोहीम जोरात सुरू असल्याचे चित्र धायरी फाटा, राजयोग सोसायटी आणि नांदेड चौक येथे दिसत आहे. तर, वाहतूक नियमन करण्याऐवजी वाहन चालकांकडून वसुली करण्यातच पोलीस व्यस्त असून, सिग्नल यंत्रणा बंद असल्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
वडगाव, धायरी, नऱ्हे, नांदेड, खडकवासला ही पुणे शहराची महत्त्वाची उपनगरे सिंहगड रस्त्याने जोडली आहेत. उत्तमनगर, वारजे, कोंढवे-धावडे या उपनगरांची वाहतूकही याच रस्त्यावरून होते. पर्यायी रस्ता नसल्याने वाहतुकीचा सर्व ताण मुख्य रस्त्यावर येतो. वडगाव येथील बंगळुरू महामार्ग पुलाखालील चौकातून थोड्याफार प्रमाणात वाहतूक विभागली जाते. परंतु नांदेडपर्यंत वाहतुकीचा ताण कमालीचा असतोच. प्रत्येक चौकात वाहतूक नियमन करणारे दोन किंवा तीन वाहतूक पोलीस कर्मचारी असतात.
सिग्नल यंत्रणा बंद असल्यावर वाहतूक पोलिसांनी चौकात वाहतूक नियमन करणे महत्त्वाचे असते. पण, पोलीस कर्मचारी चौकातील कोपऱ्यात उभे राहून सिग्नलच्या नियमांचे उलंघन करणारे आणि नियम मोडणाऱ्या मालवाहतूक वाहनांनाकडून दंड वसूल करण्यात व्यस्त असतात. या प्रकारांबाबत काही महिन्यांपूर्वी आक्षेप घेण्यात आला होता. यावर उत्तर देताना तत्कालिन पोलीस उपायुक्तांनी सांगितले होते, की “वाहतूक नियमन करताना कोणतेही पोलीस कर्मचारी एकत्रित दिसणार नाहीत.’ परंतु, पोलिसांनीच आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे चित्र आहे.
वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहन चालकांना दंड करणे ही वाहतूक पोलिसांचे काम आहे. परंतु सिग्नल यंत्रणा बंद असतानाही पोलीस नियमन करण्याऐवजी फक्त दंड करण्याचे काम करत असतील तर चौकशी करण्यात येईल.
– उदयसिंह शिनगाडे, वाहतूक पोलीस निरीक्षक, सिंहगड रस्ता
सिंहगड रस्ता हा दाट लोकवस्तीचा आणि वाहतुकीचा आहे. अनेक ठिकाणी रस्ता रुंदीकरण व मजबुतीकरण सुरू असल्याने वाहन चालकांना विशेषतः दुचाकी चालकांना जीव मुठीत घेऊन वाहन चालवावे लागते. सध्या अनेकांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे. त्यामुळे पोलिसांनी ही केवळ “टार्गेट’ पूर्ण करण्यासाठी वाहनांवर दंडात्मक कारवाई करू नये. आधी वाहतूक नियमन, नंतर कारवाई असे सूत्र असावे.
रूपेश घुले, उपाध्यक्ष, भाजप खडकवासला विधानसभा मतदारसंघ