नवी दिल्ली- पंजाब कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांनी आज पटियाला न्यायालयासमोर आत्मसमर्पण केले. त्यांची तुरूंगात रवानगी करण्यात आली आहे. आता त्यांना एक वर्ष तुरुंगात काढावे लागणार आहे. 34 वर्षे जुन्या रोड रेज प्रकरणी सिद्धू यांना सर्वोच्च न्यायालयाने एक वर्षाची शिक्षा सुनावली आहे. सिद्धूंचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनीही दिलासा मिळण्याच्या आशेने सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती, मात्र तेथूनही त्यांना दिलासा मिळाला नाही.
नवज्योतसिंग सिद्धू यांनी मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर आत्मसमर्पण केले आहे. ते न्यायालयीन कोठडीत आहे. आता वैद्यकीय तपासणी आणि इतर कायदेशीर प्रक्रियांचा अवलंब केला जाईल अशी माहिती तत्पूर्वी त्यांच्या माध्यम सल्लागाराने दिली होती.
अभिषेक मनु सिंघवी यांनी सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्ती एएम खानविलकर यांच्या खंडपीठासमोर नवज्योतसिंग सिद्धूच्या प्रकरणाचा उल्लेख केला. अभिषेक मनू सिंघवी यांनी सिद्धूच्या प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत आत्मसमर्पण करण्यासाठी काही काळ विनंती केली. त्यावर न्यायमूर्ती खानविलकर म्हणाले की, हे प्रकरण विशेष खंडपीठाशी संबंधित आहे. याप्रकरणी सरन्यायाधीशांकडे अर्ज दाखल करून सुनावणीची मागणी केली होती.
दरम्यान, सर्वोच्च न्यायालयात आजपासून म्हणजेच 20 मे नंतर उन्हाळी सुट्ट्या सुरू होत आहेत. 51 दिवस उन्हाळी सुट्ट्या असतील. या कालावधीत केवळ तातडीच्या प्रकरणांवर सुनावणी होईल. यावेळी सर्वोच्च न्यायालयाने तातडीच्या प्रकरणांच्या सुनावणीसाठी उन्हाळी खंडपीठाव्यतिरिक्त पाच खंडपीठांची स्थापना केली आहे, जी दीर्घकाळ प्रलंबित प्रकरणांची सुनावणी करतील.