रक्षाबंधनच्या दोनच दिवसांनतर निरगुडे येथे दुःखद घटना
भिगवण-निरगुडे (ता. इंदापूर) येथे बहिण-भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाला आहे. रक्षाबंधन नंतर दोन दिवसांनंतर घडलेली ही घटना भिगवण परिसराला चटका लावणारी आहे.
दीपाली चंद्रकांत मिसाळ (वय 12) व कृष्णा चंद्रभान मिसाळ (वय 8) अशी या भावंडांची नावे आहेत. याबाबत मुलांची आई रेणुका चंद्रभान मिसाळ (वय 27, रा. केकाण वस्ती, निरगुडे, ता. इंदापूर) यांनी भिगवण पोलीस ठाण्यात माहिती दिली. मिसाळ कुटुंबीय येथे मोलमजुरी करून आपला उदरनिर्वाह करीत आहे.
मंगळवारी (दि. 5) दुपारी अडीचच्या सुमारास घरालगतच असलेल्या शेततळ्यात त्यांच्या कुटुंबातील ही मुले पोहायला म्हणून गेली होती; परंतु त्यांना पोहता न आल्याने दोघेही पाण्यात बुडाले. यावेळी शेजारी राहणारे प्रविण ब्रम्हदेव केकाण यांनी मुले शेततळ्यात बुडाल्याचे मिसाळ कुटुंबीयांना फोन करून कळवले. तातडीने मुलांना हॉस्पिटलमध्ये नेऊन तपासले; मात्र तोपर्यंत दोघांचाही मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. यानंतर रात्री उशशिरा याची खबर भिगवण पोलिस ठाण्यात देण्यात आली.
बहिण-भावाचा अत्यंत महत्त्वाचा सण असलेल्या रक्षाबंधन नंतर दोनच दिवसांत या भावंडांच्या मृत्यूने निरगुडे तसेच भिगवण परिसरावर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत अधिकचा तपास भिगवण पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक जीवन माने यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप कारंडे हे करीत आहेत.