नगर -छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम या दोघांसह जिल्ह्यातील 4 गुन्हेगारी टोळ्यांना एक वर्षासाठी नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी याबाबत आदेश काढले.
उपमहापौर असताना श्रीपाद छिंदम याने छत्रपती शिवाजी महाराजांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. राज्यात सर्वत्र त्याच्याविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात आले होते. श्रीपाद छिंदम व श्रीकांत छिंदम यांच्याविरुद्ध नगर शहरात संघटीतपणे टोळी तयार करून गैरकायद्याची मंडळी जमवून मारहाण करून गंभीर दुखापत करणे, रक्कम बळजबरीने काढून घेणे, ठार मारण्याची धमकी देणे, महिलेस लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन करणे, धार्मिक भावना दुखावणे, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे,
जातीवाचक शिवीगाळ करणे, अनाधिकाराने मालमत्तेचे नुकसान करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत. तोफखान्याच्या पोलिस निरीक्षक ज्योती गडकरी यांनी दोघांच्या तडीपारीचा प्रस्ताव पोलिस अधीक्षक पाटील यांच्याकडे पाठवला होता. अधीक्षक पाटील यांनी त्याला मंजुरी देत श्रीपाद शंकर छिंदम व श्रीकांत शंकर छिंदम या दोघांनाही नगर जिल्ह्यातून 1 वर्षाकरीता हद्दपार केले आहे.
केडगावच्या दुधसागर सोसायटीत राहणारा सराईत गुन्हेगार अविनाश विश्वास जायभाय, त्याच्या टोळीतील सदस्य ऋषिकेश अशोक बडे व नितीन उर्फ किरण किसन लाड या तिघांची टोळीला 2 वर्षांकरिता, वाडेगव्हाण (ता. पारनेर) येथील सराईत गुन्हेगार अक्षय सुभाष सोनवणे यास 2 वर्षांकरिता तर संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील सराईत गुन्हेगारांच्या टोळीचा प्रमुख संदीप भाऊसाहेब घुगे याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य मारुती सगाजी नागरे, विजय बच्चू डोंगरे, अमोल सोमनाथ डोंगरे, दीपक सोमनाथ डोंगरे, शशिकांत उर्फ मंगेश शिवाजी नागरे या 6 जणांच्या टोळीला संगमनेर तालुका, राहाता व राहुरी या तालुक्यातून 1 वर्षाकरीता हद्दपार केले आहे.