शब्दांकन : नितीन राऊत, वडूज
वडूज, ता. खटाव येथील श्री ज्ञानेश्वर पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची श्री गणेश जयंती दिवशी म्हणजेच आज दि. 28 रोजी श्री सिद्धिविनायक रथोत्सवाने सांगता होत आहे. परिसरातील भाविकांना ही जणू पर्वणीच असते. सामाजिक ऐक्य व सलोखा वाढीस लावण्याऱ्या या सोहळ्याचा घेतलेला आढावा…..
खटाव तालुक्याची राजधानी समजल्या जाणाऱ्या वडूज शहर म्हणजे राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक पटलावर एक मध्यवर्ती ठिकाण आहे. विविध शासकीय, निमशासकीय कार्यालये,महत्त्वाची बाजारपेठ व सोईसुविधाने उपलब्ध असलेले हे ठिकाण.1965 ते 1970 दरम्यान गावचे स्वरूप ग्रामीणच होते. येथील बाजार पटांगणात गावातील ग्रामस्थ, मोटार मालकांनी पुढाकार घेऊन श्री गणेश मंदिर उभारले. राजस्थानहून उजव्या सोंडेची श्री सिद्धिविनायकाची मूर्ती आणून गणेश जयंतीदिवशी कलशारोहण केले.
लोकांच्यातील आध्यत्मिक भावना वाढीस लागावी,आपापसातील जिव्हाळा वृद्धिंगत व्हावा या उद्देशाने त्या काळात पुंडलिक महाराज वेळूकर यांनी गावोगावी पारायणे सुरु केली होती. वडूज येथे देखील 1983 साली या पारायण सोहळ्याला सुरुवात झाली. प्रारंभीच्या काळात हा सोहळा मंदिरासमोर छोटेखानी मंडपात होत असे. सोहळ्यातून साधल्या जाणाऱ्या सामाजिक ऐक्याच्या संदेशामुळे हा सोहळा नावारूपास येऊ लागला. पारायण सोहळ्याने सर्वधर्म समभावाचे परिसरात वेगळे व्यासपिठ निर्माण केले. पारायण सोहळ्यात पहाटे काकड आरती, ज्ञानेश्वरी वाचन, सार्वजनिक भजने मंडळे, प्रवचन, कीर्तन, जागर असे धार्मिक कार्यक्रम नित्यनियमाने होऊ लागले.
राज्यातील नामवंत प्रवचनकार, कीर्तनकार, संतसाहित्याचे अभ्यासक अशा सामाजिक आध्यत्मिक क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी हजेरी लावून सोहळ्याची व भाविकांची अधिक आत्मियता वाढवली. तर नामदेव आप्पा शामगावकर यांच्यासारख्या ख्यातीच्या जेष्ठ कीर्तनकारामुळे पंचक्रोशीतील लोकांना सोहळ्याच्या अधिक जवळ केले. पारायण सोहळ्याची श्री गणेश जयंतीदिवशी सिद्धिविनायक रथोत्सव मिरवणुकीने सांगता करण्यात येऊ लागली.
रथोत्सव मिरवणूक व लोकवर्गणीतून जमलेल्या निधीतून या मंदिराच्या नूतनीकरणाबरोबर गावातील मंदिराचा जीर्णोद्धार, मंदिराची रंगरंगोटी, भाविकांसाठी भक्त निवासाच्या खोल्या, रथग्रह अशी लाखो रुपयांची विकास कामे उभी राहिली. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी मंदिर व परिसराला छोटेखानी यात्रेचेच स्वरूप प्राप्त होते. परिसरातील भाविक या दिवशी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी गर्दी करतात. येथील रथोत्सवादिवशी परिसरातील भाविकांची मोठी गर्दी असते. सन 2000 सालापासून परिसरातील भाविक स्वयंस्फूर्तीने महाप्रसाद आयोजित करतात.
पुढील कित्येक वर्षांपर्यंत महाप्रसाद देण्यासाठी नंबर लागलेले आहेत हे एक वैशिष्ट्य मानावे लागेल. आतापर्यंत औदुंबर नारायण नरळे (अकलूज), विटा बॅंकेचे अध्यक्ष विनोद गुळवणी, पोलीस निरीक्षक त्रिंबक तांदळे,कै. तुकाराम माळी, हिंदुराव गोडसे, प्रल्हाद गोडसे, सुभाष गोडसे, लता पवार, श्री जोतिर्लिंग रिक्षा स्टॉप, रमेश लक्ष्मण गोडसे, संदीप गोडसे, लक्ष्मण काटकर (दिवड), बाळासाहेब सीताराम गोडसे,विठ्ठल खडके, सुभाष उंदडे, अमोलसेठ गोडसे, सचिनसेठ गोडसे, संभाजी व शहाजी साहेबराव गोडसे, अशोक, विजय, धनंजय संपतराव काळे तसेच कै. तात्या माळी यांची मुले प्रकाश व दिलीप यांनी महाप्रसाद दिला.
यावर्षी हरिदास ज्ञानदेव जाधव व मित्र परिवार (सुधीर फर्निचर) वडूज यांच्या तर्फे महाप्रसाद दिला जाणार आहे. जेष्ठ कार्यकर्ते तात्या माळी यांनी मंदिराच्या सेवेसाठी आपले पूर्ण आयुष्य वाहिले. दररोज पहाटे चार वाजलेपासून नित्यनेमाने श्री ची सेवा सुरू होत असते. सकाळ, संध्याकाळ आरती विविध धार्मिक कार्यक्रम होत असतो.