पुणे – वाढत्या पुणे शहराला पाण्याची गरज आहे. परंतू जिल्ह्यात धरणासाठी एकही साइड शिल्लक नाही. त्यामुळे नवे धरण बांधता येत नाही. मुळशी हे वीजनिर्मिती धरण आहे. ज्यावेळी विजेला जादा मागणी असते, अशा पीक-अवरवेळी मुळशीतून वीज निर्मिती करण्यात यावी. सध्या पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याने मुळशी धरणातून पुणे शहराला पाणी मिळावे, अशी सूचना करण्यात आली आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.
पवार म्हणाले, कृष्णा खोरे तंटा लवादाने दिलेल्या निर्णयानुसार पाणी वाटप केले जाते. आंध्रप्रदेश, कर्नाटक आणि महाराष्ट्र या तीन राज्यांसाठी पाणी वाटपाचे सूत्र ठरले आहे. मुळशी धरण हे टाटांनी वीजनिर्मितीसाठी बांधले आहे. त्यातून वीजनिर्मिती केली जाते.
पीक-अव्हर्समध्ये वीजनिर्मिती करण्यात यावी. त्याचबरोबर वीजनिर्मितीसाठी सौर उर्जा, पवन उर्जा आणि अणुउर्जा यांचा वापर वाढवण्यात यावा. राज्य शासनाने पाण्याचे प्राधान्यक्रम ठरविले आहे. त्यानुसार पहिले प्राधान्य पिण्याच्या पाण्याला आहे, दुसरे शेती आणि तिसरे उद्योग-व्यवसायाला असे पाणी वापराचे प्राधान्य ठरले आहे. त्यामुळे पिण्यासाठी मुळशी धरणातून पाणी मिळावे, अशी सूचना केली असल्याचे पवार यांनी सांगितले.