मुस्लीम व दलित संघटनांची दुचाकी रॅली
सातारा – जमियत – उलेमा – ए – हिंद व परिवर्तनवादी बहुजन संघटनांनी “सीएए’ व “एनआरसी’ कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या “भारत बंद’ला बुधवारी साताऱ्यात अल्प प्रतिसाद मिळाला. सातारा शहरात नेहमीप्रमाणे दळणवळण व व्यवहार सुरू राहिल्याने बंदचा फारसा प्रभाव जाणवला नाही.
“भारत बंद’च्या निमित्ताने जमियत – उलेमा- ए – हिंद व बहुजन क्रांती मोर्चा व इतर संघटनांच्या आंदोलकांनी सातारा शहरातून दुचाकी रॅली काढली. ही रॅली पोवई नाक्याकडून राजवाडा गांधी मैदान येथे नेण्यात आली. याठिकाणी “सीएए’ व “एनआरसी’ कायद्याच्या निषेधार्थ जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सकाळी राजवाडा परिसरात काही काळ बंद सदृश वातावरण जाणवत होते. मात्र व्यापाऱ्यांनी आधीच ठरवल्याप्रमाणे सकाळी साडेदहाच्या नंतर दुकाने उघडून कामकाज सुरू ठेवले. रिक्षा व बसेस चालू राहिल्याने विद्यार्थी वाहतूक सुरळीत राहिली. सातारा शहरातील जनजीवनावर भारत बंदचा कोणताही प्रभाव पडल्याचे दिसून आले नाही. साताऱ्यात बंदला अल्प प्रतिसाद मिळाला.